निवडणुकांच्या धामधुमीत ‘महापौर‘ प्रकरण पडले मागे
By Admin | Updated: April 8, 2015 23:58 IST2015-04-08T23:50:15+5:302015-04-08T23:58:54+5:30
नेत्यावर निष्ठेसाठी झुंबड : नगरसेवकांनी महापालिकेकडे फिरवली पाठ

निवडणुकांच्या धामधुमीत ‘महापौर‘ प्रकरण पडले मागे
कोल्हापूर : नेत्यांचे अस्तित्व अन् अस्मिता पणाला लागलेली गोकुळ, जिल्हा सहकारी बॅँक व कसबा बावड्यातील राजाराम सहकारी कारखान्याच्या निवडणुकीची धामधूम लागून आली आहे. सहा महिन्यांत महापालिकेची निवडणूकही होत आहे. नगरसेवकांत नेत्यांवरील निष्ठा दाखविण्याची झुंबड सुरू आहे. त्यामुळे नगरसेवकांनी महापालिकेकडे पाठ फिरविली आहे. परिणामी या सर्व घडामोडींत महापौरांचा राजीनामा प्रकरण मागे पडल्याचे चित्र आहे.आमदार महादेवराव महाडिक, हसन मुश्रीफ, माजी आमदार पी. एन. पाटील व सतेज पाटील, विनय कोरे यांचे राजकीय हितसंबंध गोकुळ, राजाराम व केडीसीसीमध्ये गुंतले आहेत. हे सर्व नेते महापालिकेच्या राजकारणाशी निकटचा संबंध असणारे आहेत. यातच या निवडणुकीच्या माध्यमातून
शह-काटशहाच्या राजकारणाला ऊत आला आहे. तिन्ही संस्थांचे कार्यक्षेत्र जिल्हा हेच असल्याने नेत्यांची मोठी दमछाक होत आहे. नेत्यांच्या मदतीला नगरसेवक धावून आले आहेत. नेते कोठे जातील तिथे काही नगरसेवक सावलीसारखे त्यांच्या पाठीशी आहेत.
पडद्यामागील बैठकांचे नियोजन करणे, निरोप देणे, घडामोडींकडे लक्ष ठेवणे, संभाव्य उमेदवारांची चाचपणी करणे, आदी महत्त्वाची कामे नेत्यांनी या नगरसेवकांवर सोपविली आहेत. गेले आठ दिवस सर्व पक्षांचे नगरसेवक यामुळे व्यस्त आहेत. संध्याकाळी दररोज न चुकता येणारे वीस ते पंचवीस वजनदार नगरसेवक यामुळे महापालिकेकडे फिरकलेलेच नाहीत. आघाडीचे प्रमुख नगरसेवक व गटनेते अनुपस्थित असल्याने महापौर तृप्ती माळवी यांच्या राजीनाम्याचे प्रकरण थंड बासनात गेले आहे. १७ एप्रिलपर्यंत त्यांच्या विरोधातील ठरावासह अर्थसंकल्पाच्या मंजुरीवर स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे.
२० एप्रिलपर्यंत महापालिकेची महासभा होणे अपेक्षित आहे. तीन निवडणुकांमुळे महापौरांविरुद्ध विरोधाची धार कमी
झाल्याचे महापालिकेतील चित्र
आहे. (प्रतिनिधी)