मनसुख हिरेन प्रकरण म्हणजे ‘पंचवार्षिक योजना’ आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:17 IST2021-06-19T04:17:04+5:302021-06-19T04:17:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘ॲन्टेलिया’ या घरासमोर सापडलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या ...

मनसुख हिरेन प्रकरण म्हणजे ‘पंचवार्षिक योजना’ आहे का?
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘ॲन्टेलिया’ या घरासमोर सापडलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील खरा मास्टर माइंड अजून मोकाटच आहे. याबाबत माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडेच प्रसारमाध्यमांनी अंगुलीनिर्देश केेेले आहेत. दोन्ही घटनांचा तपास म्हणजे पंचवार्षिक योजना आहे का? असा सवाल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) पत्रकार परिषदेत केला.
कोल्हापूर शहरातील थेट पाईपलाईन आढावा बैठकीनंतर शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, मनसुख हिरेन हत्या व ॲन्टेलियासमोरील सापडलेली स्फोटक प्रकरणात ‘एनआयए’ने प्रदीप शर्माला अटक केली. मात्र, या सगळ्यांचा मास्टर माइंड अजून मोकाट आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात असल्याशिवाय एवढे मोठे धाडस कोणी करू शकत नाही. या प्रकरणाचा तपास दुसऱ्या बाजूने वळवण्यासाठी भाजपच्या सांगण्यावरून परमबीर सिंगांनी पत्र दिले. त्यामुळे माझे अजूनही म्हणणे, या प्रकरणातील मास्टर माइंड ‘एनआयए’ने महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणला पाहिजे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीराजेंनी राज्य सरकारच्या ट्रपमध्ये अडकू नये, असे आवाहन केले होते. याबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले, मराठा आरक्षण व राज्याच्या पातळीवरील मागण्यांबाबत खासदार संभाजीराजे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झालेली आहे. राज्याच्या अखत्यारितील सर्व मागण्या पूर्ण करण्याचे वचन दिलेले आहे. मग हा ट्रॅप कसला?
विधानसभाध्यक्षांची निवड अधिवेशनात
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे पद रिक्त आहे. पावसाळी अधिवेशनात विधानसभेला नवीन अध्यक्ष मिळेल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
आघाडीबाबतचा निर्णय ज्या-त्यावेळी होईल
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केल्याबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका आहेत. अजून वेळ असून आघाडीबाबत कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आमचे नेते शरद पवार हे निर्णय घेतील.
राममंदिरावरून भाजपचे विनाकारण
आयोद्धेतील राम मंदिराअगोदर आपण कागलमध्ये मंदिर उभा केले. त्यामुळे राम मंदिर हे सगळ्यांचे श्रद्धास्थान आहे. मात्र, ज्या पद्धतीने जागा खरेदीवरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत गोंधळ घातला, तो चुकीचा असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.