महामार्गावर गावांच्या फाट्यावर उड्डाणपूल, भुयारी मार्ग करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST2021-05-31T04:18:28+5:302021-05-31T04:18:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सातारा-कागलपर्यंतचा भाग सहा पदरीकरण होणार आहे. यामध्ये येणाऱ्या गावांची दळणवळणाची चांगली ...

महामार्गावर गावांच्या फाट्यावर उड्डाणपूल, भुयारी मार्ग करा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सातारा-कागलपर्यंतचा भाग सहा पदरीकरण होणार आहे. यामध्ये येणाऱ्या गावांची दळणवळणाची चांगली सोय व्हावी, रस्ता ओलांडताना स्थानिकांची गैरसोय होवू नये, यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.
दौरा दरम्यान, कागल ते किणीपर्यंत ग्रामस्थांनी रस्ता ओलांडण्यासाठी उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाची मागणी केली. ठिकठिकाणी थांबून ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून मागणीचे निवेदन स्वीकारले. महामार्ग सहापदरीकरणाचे प्रत्यक्षात काम करताना कोणताही अडथळा येवू नये, महामार्गालगतच्या गावांच्या दळण वळणात अडचणी येवू नये, यासाठी पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रत्यक्ष पाहणी दौऱ्याचे आयोजन केले.
रविवारी दुपारी तीन वाजता कागलपासून दौऱ्याला सुरुवात केले. येथे मंत्री मुश्रीफ सहभागी झाले. नगराध्यक्ष माणिक माळी, सहापदरी कृती समितीचे अध्यक्ष भय्या माने, उपाध्यक्ष संजय ठाणेकर, बी. जे. नाईक यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. त्यांनी निवेदनाद्वारे लक्ष्मी टेकडी येथे उड्डाणपूल उभारावे किंवा टू-वे भुयारी मार्ग करावा, कागल पंचायत समितीजवळील भुयारी मार्गाची रुंदी आणि उंची वाढवावी, मुरगूड नाका येथे उड्डाणपूल करावे, महामार्गावरून कागल शहरात प्रवेश करणाऱ्या जोडपुलाची रूंदी वाढवावी आदी दहा मागण्या करण्यात आल्या.
तेथून पथक लक्ष्मी टेकडी येथे आले. तिथे पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील प्रमुख उद्योजकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. चर्चेवेळी भुयारी आणि उड्डाणपुलांसंबंधी चर्चा केली. चर्चेच्या शेवटी पालकमंत्री पाटील, खासदार मंडलिक यांनी उद्योजकांच्या मागणीचा विचार प्राधान्याने करावा, अशी सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर कणेरी, विकासवाडी, गोकुळ शिरगाव फाट्यावर थांबून पाहणी करण्यात आली. या गावातील ग्रामस्थांनीही रस्ता ओलांडताना प्रचंड गैरसोय होत असल्याचे सांगितले. उजळाईवाडी फाट्यावर ग्रामस्थांनी कोल्हापूर शहरातून गावात जाण्यासाठी असलेला भुयारी मार्ग रूंद करावा किंवा स्वतंत्र उड्डाणपूल उभारावे, अशी मागणी केली. येथे सध्या उड्डाणपूल असल्याने नवीन पूल बांधणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सरनोबतवाडी, उचगाव, तावडे हॉटेल, शिरोलीफाटा, नागाव, टोप, अबंप, वाठार, किणी फाट्याचीही पाहणी करून या गावातील ग्रामस्थांचीही मागणी जाणून घेतली.
दौऱ्यात राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर, सर्वेअर आर. डी. काटकर, तहसीलदार शीतल मुळे आदी अधिकारी उपस्थित होते.
चौकट
फटाक्यांची आतषबाजी आणि स्वागत
पाहणीवेळी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री पाटील, खासदार मंडलिक यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांचे स्वागत करत होते. सरनोबतवाडी फाट्यावर तर चक्क फटाक्याची आतषबाजी करून स्वागत केले.
कोट
राष्ट्रीय महामार्गावरील सातारा ते कागलपर्यंत सहापदरीकरण होणार आहे. या दरम्यान अनेक गावे आहेत. या ग्रामस्थांची महामार्गाच्या दोन्ही बाजूला शेती आहे. औद्योगिक वसाहती आहेत. या सर्वांची सोय होण्यासाठी स्थानिकांशी चर्चा केली. कागल ते किणी नाक्यापर्यंत येणाऱ्या सर्व गावांच्या फाट्यावर थांबून ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.
सतेज पाटील, पालकमंत्री