इचलकरंजीतील वस्त्रोद्योगापुढे महापुराचे नवे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:25 IST2021-07-30T04:25:16+5:302021-07-30T04:25:16+5:30
: पूर भागातील व्यावसयिकांना मदतीची अपेक्षा विनायक शिंपुकडे लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील वस्त्रोद्योग व्यवसाय सर्वदूर परिचित आहे. ...

इचलकरंजीतील वस्त्रोद्योगापुढे महापुराचे नवे संकट
: पूर भागातील व्यावसयिकांना मदतीची अपेक्षा
विनायक शिंपुकडे लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील वस्त्रोद्योग व्यवसाय सर्वदूर परिचित आहे. येथील कापडाला देशातील अनेक भागासह विदेशातदेखील मोठी मागणी आहे. मात्र २०१९ सालचा महापूर, गतवर्षापासून सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे यंत्रमागधारक मेटाकुटीला आला आहे. अशातच वस्त्रोद्योगापुढे पुन्हा एकदा महापुराचे संकट उभे ठाकले आहे.
कोणत्याही परिस्थितीत वस्त्रोद्योग जगला पाहिजे, यासाठी अनेक व्यावसायिक जीवापाड मेहनत घेत आहेत. तरीही त्यांच्यासमोरील ग्रहण काही केल्या संपत नाही. शेतीखालोखाल वस्त्रोद्योग हा रोजगार उपलब्ध करून देणारा व्यवसाय आहे. शहर व परिसरात दररोज लाखो मीटर कापडाची निर्मिती होत असून, करोडो रुपयांची उलाढाल होते. शहरातील पॉपलिन कापडाचे उत्पादन करणारे यंत्रमागधारक व्यवसाय मंदीत असल्याने २५ जूनपासून बंद ठेवले आहेत. जवळपास एक महिना व्यवसाय बंद असल्याने ८ ते १० हजार यंत्रमागावरील दररोज अंदाजे १५ लाख मीटर कापडाचे उत्पादन ठप्प झाले असून, महिन्याला १०० कोटींचा फटका बसला आहे. अशातच महापूर आल्याने त्यांचे पाय आणखीनच खोलात रुतले आहेत. यंदाच्या महापुरामुळे शहर व परिसरातील एक हजारांहून अधिक कारखान्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
यंत्रमाग उद्योगावर सायझिंग, वार्पिंग, वायडिंग, हमाल वाहतूक यासह इतर अनेक छोटे-मोठे उद्योग अवलंबून आहेत. हजारो कामगारांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या नागरिकांच्या घराचे, दुकानाचे नुकसान झाले आहे, त्यांना १० हजार रुपये, तर अन्नधान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. तांदूळ, गहू, तूरडाळ, रॉकेल अशा अत्यावश्यक वस्तूंचेही मोफत वाटपाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शासनाने आर्थिक अरिष्टात सापडलेल्या वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी द्यावी, अशी मागणी यंत्रमागधारकांतून होत आहे.
चौकट
केवळ घोषणाबाजी, अंमलबजावणी कधी
२७ अश्वशक्तीवरील यंत्रमागासाठी अतिरिक्त ७५ पैशांची, तर साध्या यंत्रमागासाठी १ रुपयांची अतिरिक्त सवलत व ५ टक्के व्याज अनुदान, यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कामगार कल्याणकारी मंडळ निर्माण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याचबरोबर यंत्रमागधारकांना मल्टीपार्टी वीज जोडणी देण्याची अंमलबजावणी झाली नाही, आदींसह राज्याबरोबरच केंद्राच्या अखत्यारितही विविध प्रश्न आजही सुटलेले नसल्याने उद्योगाची वाटचाल बिकट बनली आहे.
प्रतिक्रिया
गेल्या चार-पाच वर्षांपासून यंत्रमाग व्यवसाय अनेक अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. त्यातच महापुराच्या अस्मानी संकटामुळे अधिकच अडचण निर्माण झाली आहे. जोपर्यंत त्यांना शासनाकडून मदत मिळणार नाही, तोपर्यंत उद्योजक आपले कारखाने सुरू करू शकणार नाहीत. सन २०१९ साली यंत्रमागधारकांना सरसकट ५० हजारांची मदत केली. मात्र, ही मदत तुटपुंजी असल्याने यंदा किमान दीड लाख रुपयांची मदत मदत द्यावी. सतीश कोष्टी, पॉवरलूम असोसिएशन