शिंगणापूर, हनुमंतवाडी, नागदेवाडीत घरांच्या पडझडीत दीड कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST2021-07-30T04:24:32+5:302021-07-30T04:24:32+5:30
कोपार्डे : महापुराने गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली असून, करवीर तालुक्यातील हणमंतवाडी, शिंगणापूर आणि नागदेवाडी या गावांनाही महापुरामुळे मोठा ...

शिंगणापूर, हनुमंतवाडी, नागदेवाडीत घरांच्या पडझडीत दीड कोटींचे नुकसान
कोपार्डे : महापुराने गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली असून, करवीर तालुक्यातील हणमंतवाडी, शिंगणापूर आणि नागदेवाडी या गावांनाही महापुरामुळे मोठा तडाखा बसला आहे. गावात महापुराचे पाणी शिरल्याने घरांबरोबरच जनावरांच्या गोठ्यांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. यात दीड ते पावणेदोन कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दि. २२ ते २४ जुलै या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे नागदेवाडी, शिंगणापूर आणि हणमंतवाडीत पाणी शिरले. २०१९ साली आलेल्या महापुरात या गावातील अनेक घरे जमीनदोस्त झाली होती. जुजबी शासकीय मदत व कर्जे उचलून नव्याने डोक्यावर छत उभारुन या तीनही गावांमधील नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी पुन्हा नव्याने सुरुवात केली होती. याच दरम्यान कोरोना महामारीमुळे रोजगार, शेती, दुग्धव्यवसाय आतबट्ट्यात आला. यातून सावरण्याचा आटापिटा सुरू असताना महापुराचे पाणी घरात घुसल्याने संसार पुन्हा महापुरात वाहून गेल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहेत. नागदेववाडीतील १४ ते १५ घरांची व गोठ्यांची पडझड झाली असून, ४५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हणमंतवाडीत २२ ते २३ घरांची पडझड झाली असून, ४ घरे पूर्णतः जमीनदोस्त झाली आहेत. यात ५५ ते ६० लाखांचे नुकसान झाले आहे. शिंगणापूरमध्ये हीच अवस्था असून, येथे काही घरांची अशतः पडझड झाली असून, १५ ते २० लाखांचे नुकसान झाले आहे.
चौकट
:
शासकीय अधिकारी केव्हा भेट देणार
शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या तीनही गावांना अजून कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा शासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाही. करवीर तालुक्यातील सधन व गुऱ्हाळ घरांचे माहेरघर म्हणून या तीन गावांचा नावलौकिक होता. पण सलग दोन वर्षे महापुराचा सामना करताना घरात पाणी आणि शिवारातील पिकांचा चिखल होत असल्याने डोक्याला हात लावून बसण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे.
कोट : महापुरात निम्मे गाव पाण्याखाली गेले असून, अनेक घरांची पडझड झाली आहे. घरांचे छत उभे करण्यासाठी शासनाने तातडीने मदत करावी.
- योगेश ढेंगे, सरपंच, नागदेववाडी.
कोट : हणमंतवाडीत घरांची पडझड झाली आहेच. पण महापुराच्या पाण्यात गेली आठ दिवस पाणी असल्याने ऊसपीक कुजले आहे. संग्राम भापकर, सरपंच हणमंतवाडी
फोटो :२९ हणमंतवाडी नुकसान १) महापुराच्या पाण्यात ऊसपीकाचे नुकसान २)पाणी घरात शिरल्याने घरांची पडझड