गुऱ्हाळ मालकांचे बेकीमुळे नुकसान
By Admin | Updated: December 19, 2014 23:22 IST2014-12-19T23:15:57+5:302014-12-19T23:22:35+5:30
जिल्ह्यातील स्थिती : कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन

गुऱ्हाळ मालकांचे बेकीमुळे नुकसान
सहदेव खोत - पुनवत कोल्हापूर जिल्ह्यात १२ डिसेंबरपासून गुळाच्या हमीभावासाठी ‘गुऱ्हाळघरे बंद’ आंदोलन सुरू झाले आहे; मात्र सांगली जिल्ह्यातील वारणा पट्ट्यातील गुऱ्हाळघरे सुरू आहेत. उत्पादित गूळ कऱ्हाडला पाठविला जातोय. जिल्ह्यातील गुऱ्हाळ मालकांमध्ये एकीचा अभाव व संघटना नसल्याने या आंदोलनाला कसलाही पाठिंबा मिळालेला दिसत नाही. परिणामी गूळ उत्पादकांबरोबरच गुऱ्हाळ मालकांचे नुकसान होत आहे. गूळ व्यापाऱ्यांचा मात्र यामध्ये फायदा होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष व इतर संघटनांनी दि. १२ पासून गुळाला हमीभाव मिळावा यासाठी आंदोलन छेडले आहे. त्यानुसार करवीर, पन्हाळा, राधानगरी, हातकणंगले, कागल तालुक्यातील गुऱ्हाळ मालकांनी गुऱ्हाळघरे बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. काही गुऱ्हाळघरातून शाहू मार्केट यार्डात आलेला गूळ संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी अडवून परत पाठविला व आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
दुसरीकडे शाहू मार्केटला हजारो क्विंटल गूळ पाठविणाऱ्या सांगली जिल्ह्यातील शिराळा अन् लगतच्या शाहूवाडी तालुक्यात मात्र गुऱ्हाळघरे सुरूच आहेत. या दोन्ही तालुक्यातील गुऱ्हाळ मालकांचा तसेच गूळ उत्पादकांचा आंदोलनाला कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
वास्तविक कोल्हापूर जिल्ह्यातील संघटना गूळ उत्पादकांसाठी संघर्ष करीत असताना, या गूळ उत्पादकांनी व गुऱ्हाळ चालकांनी या आंदोलनात सहभागी होणे गरजेचे होते.
कोल्हापूरला गूळ आंदोलन सुरू असल्याने शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी व गुऱ्हाळ मालकांनी सर्व गूळ कऱ्हाडला पाठवायला सुरुवात केली आहे. त्यांना सरासरी २१00 ते २४00 असा दर मिळत आहे. जिल्ह्यातील गुऱ्हाळमालक व गूळ उत्पादक जागरूक नसल्याने त्यात ते भरडले जात आहेत.
ंसंघटना नसल्याने व्यापाऱ्यांचा फायदा
कोल्हापूर जिल्ह्यात जसे गुऱ्हाळमालक एकसंधपणाने आंदोलनात सहभागी होत आहेत, तसे सांगली जिल्ह्यात चित्र दिसत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे गुऱ्हाळ मालकांची संघटनाच नाही. हे गुऱ्हाळमालक महत्त्वाच्या प्रश्नांवर एकत्रित येत नाहीत. याउलट त्यांच्यात उद्योगासाठी चढाओढ व संघर्ष होताना दिसतो. शिवाय गुऱ्हाळ मालकांना एकत्रित आणणाऱ्या सक्षम शेतकरी संघटना नाहीत.
गूळ उत्पादकांच्या जिवावर कऱ्हाड, कोल्हापूरचे गूळ अडत व्यापारी मोठे होत आहेत, त्या गूळ व्यापाऱ्यांनी दराच्या बाबतीत गूळ उत्पादक अडचणीत असताना बघ्याची भूमिका घेतली असल्याचे जाणवत आहे. गूळ उत्पादकांचे काहीही होवो, आपल्या फायद्यासाठी त्यांनी दुकाने सुरू ठेवली आहेत.
शिराळा तालुक्यात गुऱ्हाळ मालकांची संघटना नाही. वास्तविक सर्व गूळ उत्पादक व गुऱ्हाळ मालकांनी आंदोलनाला पाठिंबा देणे गरजेचे असताना, केवळ समन्वयाअभावी आंदोलनाला बळ मिळेनासे झाले आहे.
- सुभाष पाटील,
गुऱ्हाळमालक, कणदूर