साहित्य चळवळ झाली पुन्हा प्रगल्भ
By Admin | Updated: December 15, 2014 23:58 IST2014-12-15T23:35:39+5:302014-12-15T23:58:00+5:30
पोलंडवासियांचा ऋणानुबंध..

साहित्य चळवळ झाली पुन्हा प्रगल्भ
कोल्हापूरच्या साहित्य-सांस्कृतिक चळवळीसाठी यंदाचे वर्ष अतिशय उत्साहदायक ठरले. केशवराव भोसले नाट्यगृहाचे नुतनीकरण, विविध महोत्सव..संगीत मैफली, आणि राज्य नाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्राने मारलेली मुसंडी यामुळे सांस्कृतिक क्षेत्राला उभारी मिळाली आहे. मात्र, लाखो भाविकांवर आपली कृपादृष्टी ठेवणाऱ्या अंबाबाई मंदिराचा आणि कोल्हापूरच्या चित्रपरंपरेतला शेवटचा किरण असलेल्या चित्रनगरीच्या विकासाच्या नुसत्याच चर्चा रंगल्या.
ग्रंथ महोत्सव, कलामहोत्सव, गायन समाज देवल क्लबमध्ये रंगणाऱ्या संगीत मैफली, पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा, गुणीदास फौंडेशनचे सांगितीक कार्यक्रम.., विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलन, शाहू स्मारक भवनच्या कलादालन हाऊसफुल्ल करणारे चित्र-शिल्प प्रदर्शन, वसुंधरा फिल्म फेस्टिवल, चित्रपट साक्षर प्रेक्षक घडविण्यासाठी खास शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली चिल्लर पार्टी, विद्यार्थी चित्रपट चळवळ या सगळ््या सांस्कृतिक चळवळींनी आणि घडामोडींनी कोल्हापूरच्या कलापरंपरेचे आम्हीच खरे वारसदार असल्याचे पुन्हा अधोरेखित केले.
एकच प्याला नाटकाचे सलग १४ तास सादरीकरण करून प्रतिज्ञा नाट्यरंगने नवा विक्रम प्रस्थापित केला. प्राथमिक केंद्र म्हणून मान्यता मिळालेल्या कोल्हापूर केंद्रावर तब्बल १८ नाटकांचे सादरीकरण झाले. मात्र, कोल्हापुरातील मराठी चित्रपटसृष्टीला हे वर्ष फारसे चांगले गेले नाही. त्यात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील राजकारणाने कधी नव्ह,े ती निचतम पातळी गाठली.
पोलंडवासियांचा ऋणानुबंध..
दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान आश्रयाला आलेल्या पोलंडवासियांनी मार्च महिन्यात कोल्हापूरशी असलेल्या जुन्या ऋणानुबंधांना उजाळा दिला. पोलंडच्यावतीने कोल्हापुरात निधन झालेल्या व्यक्तींच्या दफनभूमीच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, या सर्व घटनांच्या एकमेव साक्षीदार असलेल्या वांड्रा काशीकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले.
वज्रलेपाचा वाद मिटण्याची आशा
चौदा वर्षांपासून न्यायालयीन वादात अडकलेला करवीर निवासिनी अंबाबाईच्या वज्रलेपाचा वाद यावर्षी वैकल्पिक वाद निवारण केंद्राकडे वर्ग झाल्याने हा प्रश्न मिटण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहे.
(उद्याच्या अंकात शिक्षण)
पंचंगगा घाटावरचा अनमोल ठेवा
पंचगंगा नदी घाट म्हणजे कोल्हापूरच्या धार्मिक आणि इतिहासकालीन घटनांचा साक्षीदार उन्हाळ््यात नदी पात्रातील पाणीपातळी कमी झाल्याने तब्बल ४२ वर्षांनी छत्रपती घराण्याची समाधी मंदिरे, भग्न झालेले कार्तिकेयाचे मंदिर, दशाश्वमेध घाट या प्राचीन वास्तू पाहण्याची संधी कोल्हापूरकरांसह पर्यटकांना मिळाली.
इंदुमती गणेश