पक्ष लुळापांगळा... नेत्यांच्या छावण्या बळकट

By Admin | Updated: May 23, 2016 01:03 IST2016-05-23T00:07:58+5:302016-05-23T01:03:36+5:30

काँग्रेसची स्थिती : सहा तालुक्यांत पक्ष अस्तित्वाच्या शोधात---- पक्षांचा ‘राज’रंग--काँग्रेस

Lift the party ... strengthen the camps of the leaders | पक्ष लुळापांगळा... नेत्यांच्या छावण्या बळकट

पक्ष लुळापांगळा... नेत्यांच्या छावण्या बळकट

काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष पदावरून जशी धुसफुस आहे, तशीच धुसफुस व अंतर्गत कुरघोडीचे राजकारण कमी-अधिक प्रमाणात सर्वच राजकीय पक्षांत आहे. राजकीय पक्षांचे अस्तित्व क्षीण होत असून, नेतेच पक्षांना आपल्या दावणीला बांधू लागल्याचे चित्र दिसत आहे. विधानसभेच्या निवडणुका होऊन दीड ते पावणेदोन वर्षे झाली. येत्या गुरुवारी (दि. २६) लोकसभेच्या निवडणुका होऊन दोन वर्षे होत आहेत व त्याच जोडीला आगामी सहा महिन्यांत जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांतील या बेदिलीचा वेध आजपासून...

 

पक्ष लुळापांगळा, तर नेत्यांच्या छावण्या मात्र बळकट झाल्याचे चित्र जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये दिसते. संघटना विस्कळीत झाली आहे. कार्यकर्त्यांना कोणीही जुमानत नाहीत. सोयीनुसार प्रत्येकजण पक्षाचा वापर करून घेत आहे. याचा परिणाम म्हणून बारापैकी सहा ते सात तालुक्यांत पक्ष अस्तित्वाच्या शोधात आहे. आता तर जिल्हाध्यक्ष पदावरून पी. एन. पाटील विरुद्ध आमदार सतेज पाटील अशी विभागणी झाली आहे. पुढच्या राजकारणात ही दुफळी अधिक वाढणार आहे. सतेज पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या प्रेमात आहेत; तर ‘पी. एन.’ यांना ‘सर्वपक्षीय’ महादेवराव महाडिक यांचे पाठबळ आहे.जिल्हा काँग्रेसचा गेल्या गुरुवारी (दि. १९) मेळावा झाला. हा तसा राजकीय मेळावा नव्हताच; कारण प्रश्न दुष्काळग्रस्तांचा होता. त्यांच्याकडे राज्य सरकार लक्ष देत नाही म्हणून सरकारला जाब विचारण्याचे धोरण म्हणून जिल्हा काँग्रेसने मेळाव्याचे आयोजन केले होते; परंतु त्याकडे सतेज पाटील व आवाडे यांनी स्वत: तर पाठ फिरवलीच; शिवाय त्यांचा एकही कार्यकर्ता मेळाव्याकडे फिरकला नाही. त्यातून पक्षातील दुही चव्हाट्यावर आली. सद्य:स्थितीत जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील की प्रकाश आवाडे, हा वाद तूर्त लांबणीवर पडला असला तरी त्यांच्यातील अंतर कमी झालेले नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपर्यंत प्रभारी म्हणून ही जबाबदारी पी. एन. यांच्याकडेच राहील, असे दिसत आहे. त्यात प्रदेश काँग्रेसमध्येही अडचणी वाढल्या आहेत. आदर्श घोटाळा प्रकरणात इमारत पाडून फौजदारी करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे प्रदेशाध्यक्षपद डळमळीत झाल्याचे पक्षाच्या वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे ते स्वत:च अस्थिर असल्यावर जिल्हाध्यक्षपदाच्या राजकारणात ते काही धोका पत्करणार नाहीत. शिवाय सध्या जे तालुकाध्यक्ष आहेत, त्यांतील बहुतांश ‘पी. एन.’ यांचे समर्थक असल्याने त्यांच्याकडून हे पद काढून घेणे सद्य:स्थितीत अवघड आहे.आजरा, गडहिंग्लज, शाहूवाडी, पन्हाळा, भुदरगड आणि कागल या तालुक्यांत काँग्रेस विस्कळीत आणि दुर्बल आहे. आजऱ्यात काँग्रेसला दोन आपटेंचा आधार आहे. गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे हे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे समर्थक, तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष हे आमदार सतेज पाटील यांचे समर्थक.
महिला काँग्रेसच्या अंजना रेडेकर यांचाही हा तालुका; परंतु या तिघांचाही तालुक्याच्या राजकारणावर प्रभाव नाही. एका जिल्हापरिषद मतदारसंघापुरते त्यांचे वर्चस्व. आताही आजरा कारखान्याच्या विरोधात ते एकमेकांविरोधात उतरले आहेत. गडहिंग्लजला कार्यकर्ते कमी आणि नेतेच जास्त अशी स्थिती आहे. त्यामुळे कुणी कुणाचे ऐकायचे हा प्रश्न!
पन्हाळ्यात माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचा प्रभाव कमी झाल्यापासून काँग्रेसला नेतृत्व नाही. मध्यंतरी भारत पाटील यांना काँग्रेसमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू होत्या; परंतु त्या बंद झाल्या आहेत. कागलला संजय मंडलिक व संजय घाटगे यांचा गट शिवसेनेत गेल्यावर तिथे काँग्रेसला वालीच नाही. दत्ता घाटगे हे मी अजूनही तालुकाध्यक्ष आहे, असे सांगत असले तरी त्यांचा वकूब कसा जोखायचा, हा प्रश्नच आहे. भुदरगडमध्ये दिनकरराव जाधव काँग्रेसचे असले तरी ते शिवसेनेच्या आमदारांसोबत आहेत. माजी आमदार बजरंग देसाई यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने दिलेली उमेदवारी ऐनवेळी अर्ज माघार घेऊन पक्षाचेच नाक कापण्याचे काम केले. आताही पक्षाला ते नसून चालत नाहीत आणि त्यांनाही पक्ष लागतो, अशी स्थिती. शाहूवाडीत कर्णसिंह गायकवाड यांचा गट वजा केल्यास काँग्रेस शिल्लक राहत नाही. तुलनेत करवीर, राधानगरी, हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत स्थिती बरी आहे. गगनबावड्याचे अस्तित्वच लहान आहे. तालुका कोणताही घ्या; तिथे काँग्रेसअंतर्गत दोन-तीन छोटे-मोठे गट आहेत. त्यांच्यातच आपापल्यांत पाय खेचण्याची जोरदार रस्सीखेच आहे. त्यासाठी पक्षाला फाट्यावर मारायला सगळेच तयार आहेत. मालोजीराजे त्यांच्या सोयीनुसार पक्षात आहेत. सत्यजित कदम हे गेल्या वेळचे पक्षाचे विधानसभेचे उमेदवार असले तरी ते पुढच्या निवडणुकीत भाजपचे ‘कमळ’ हातात घेण्याची शक्यता जास्त दिसते.
माजी आमदार महाडिक यांना काँग्रेसची दारे बंद राहिल्यास कदम यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जातो. राज्य व देशपातळीवर काँग्रेसची प्रतिमा ‘बुडणारे जहाज’ अशी होत आहे. आगामी निवडणुकांसाठी सर्वांनाच पक्ष हवा आहे; परंतु केडर म्हणून संघटनात्मक बांधणी, लोकांचे प्रश्न घेऊन लढणे असे जनताभिमुख प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणे, त्यांचे प्रश्न सोडविण्याची मानसिकता काँग्रेस पक्षाच्या अजून तरी अंगवळणी पडलेली दिसत नाही. काँग्रेस पक्षाची सगळीकडेच अस्तित्वाची लढाई सुरू आहे. असे असताना नेत्या-नेत्यांमधील भांडणांची त्यात भर पडली आहे. पक्ष राहिला तरच नेत्यांना भवितव्य आहे; परंतु त्याची फिकीर कुणालाच नाही. पक्ष वाढला तरच आपले अस्तित्व राहील; अन्यथा कोणीच विचारणारे राहणार नाही, याची जाणीव पक्षातील नेत्यांना करून देणारे कोणीच नाही, त्यामुळे याबद्दल प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये चीड आणि अस्वस्थताही आहे.
(उद्याच्या अंकात : राष्ट्रवादी काँग्रेस)


कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, गोकुळ या महत्त्वाच्या संस्थांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. संस्थात्मक यश मिळाले म्हणून काँग्रेस बळकट झाली, असे म्हणता येत नाही.


शहरात पक्षाकडे कार्यकर्ते येतील, असे नेतृत्व नाही. नवा माणूस पक्षाशी जोडला जाईल, असे प्रयत्न नाहीत. शहर असो की जिल्हा; अशाच हौसे-गवसे-नवशांचा भरणा पक्षात वाढत आहे. त्यामुळे संघटनेची वीण विसविशीत झाली आहे.


जिल्ह्याच्या राजकारणात अजूनही दबदबा कायम ठेवणाऱ्या पी. एन. यांच्याकडेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपर्यंत प्रभारी म्हणून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी राहील, असे दिसत आहे.


जिल्हाध्यक्ष पदावरून पी. एन. पाटील विरुद्ध आमदार सतेज पाटील अशी विभागणी झाली आहे. असे असले तरी सध्या जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील की प्रकाश आवाडे हा वाद तूर्त लांबणीवर पडला आहे.



काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या प्रेमात आहेत, तर पी. एन. पाटील यांना ‘सर्वपक्षीय’ नेते महादेवराव महाडिक यांचे पाठबळ आहे.




विश्वास पाटील

Web Title: Lift the party ... strengthen the camps of the leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.