‘जातपडताळणी’कडून १ जूनपासून दाखले
By Admin | Updated: May 25, 2015 00:37 IST2015-05-24T22:27:55+5:302015-05-25T00:37:48+5:30
पारदर्शक व उच्चांकी पडताळणी : किमान पाच हजार दाखल्यांचे वाटप होणार

‘जातपडताळणी’कडून १ जूनपासून दाखले
कोल्हापूर : कोल्हापूरसह सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांच्या जातपडताळणीच्या सुमारे पाच हजार प्रकरणांची छाननी युद्धपातळीवर सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक प्रकरणे विद्यार्थ्यांची आहेत. सेवाविषयक अर्जांनाही प्राधान्य दिले जात आहे. आॅगस्टपर्यंत आणखी प्रलंबित प्रकरणे मार्गी लागतील, अशी माहिती विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. २चे सदस्य भालचंद्र मुळे यांनी ‘लोकमत’ला दिली. १ जून २०१५ पासून दाखले वाटपाचे काम सुरू होणार आहे. ‘एसएमएस’द्वारे हे सूचित केले जाणार असल्याने अर्जदारांनी परस्पर कार्यालयाशी संपर्क साधू नये, असे आवाहन मुळे यांनी केले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (बार्टी)च्या सहकार्याने समितीकडून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष निपटारा मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. समितीकडून शैक्षणिक व सेवाविषयक प्रकरणांची युद्धपातळीवर छाननी सुरू आहे. पात्र व परिपूर्ण अर्ज असलेल्या अर्जदारांना वैधता प्रमाणपत्राचे वाटप महिनाअखेरपासून सुरू केले जाणार आहे. सर्व सेवा व शैक्षणिकविषयक अर्जदारांना छाननी पूर्ण होताच एसएमएसद्वारे सूचित केले जाणार आहे. छाननीची प्रक्रिया जलद व पारदर्शकपणे निरंतर सुरू राहणार आहे. वेळेत दाखले देण्याचा समितीचा प्रयत्न आहे. तरी अर्जदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुळे यांनी केले आहे.
अर्जदारांनी त्या वेबसाईटमधील दिलेल्या व्ही. सी. नंबर व लॉट नंबरची माहिती व जातीचा मूळ दाखला, तसेच आपले मूळ ओळखपत्र घेऊन १ जूननंतर वैधता प्रमाणपत्र घेण्यासाठी जातपडताळणी कार्यालयात यावे. वैध ठरलेल्या अर्जदारांनी ओळखपत्र, जातीचा मूळ दाखला, आदी कागदपत्रांच्या छायांकित प्रतींसह उपस्थित राहून प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन मुळे यांनी केले. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना वेळेत वैधता प्रमाणपत्रे देणार
तत्काळ आवश्यकता असलेल्या शैक्षणिक व सेवांसाठीच्या दाखल्यांना प्राधान्य दिले जात आहे. सर्वच प्रलंबित दाखल्यांची छाननी होणार आहे. कार्यालयाशी थेट संपर्क न साधता एमएमएस व संकेतस्थळावरील सूचनांची वाट पाहावी. जातपडताळणी कार्यालयात छाननीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने विशेषत: विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. वैधता प्रमाणपत्र वेळेत दिले जाईल, असे समिती सदस्य भालचंद्र मुळे यांनी सांगितले.