बाजार समितीमध्येही विधानसभेची पुनरावृत्ती
By Admin | Updated: July 3, 2015 01:16 IST2015-07-03T01:16:38+5:302015-07-03T01:16:38+5:30
शिवसेना-भाजपचा आशावाद : ‘शिव-शाहू’ आघाडीचा प्रचार प्रारंभ; दोन्ही काँग्रेससह जनसुराज्यवर सडकून टीका

बाजार समितीमध्येही विधानसभेची पुनरावृत्ती
कोल्हापूर : मतदारांना गृहीत धरणाऱ्या कॉँग्रेस-राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने जागा दाखविली. त्याचीच पुनरावृत्ती बाजार समितीच्या निवडणुकीत होईल, असा विश्वास शिव-शाहू परिवर्तन आघाडीचे
प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य पक्षांच्या भ्रष्टाचारी कारभारावर चांगलीच तोफ डागली.कळंबा (ता. करवीर) येथील अमृतसिद्धी हॉल येथे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिव-शाहू शेतकरी आघाडीच्या प्रचार प्रारंभाचे आयोजन केले होते. यावेळी मेळाव्यात ते बोलत होते. प्रा. मंडलिक यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचारास प्रारंभ झाला.
भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश हाळवणकर, आ. चंद्रदीप नरके, आ. प्रकाश आबिटकर, आ. अमल महाडिक, आ. सुजित मिणचेकर, आ. उल्हास पाटील, आ. सत्यजित पाटील-सरुडकर, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, भगवान काटे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, ‘गोकुळ’चे संचालक अमरीश घाटगे, मारुती जाधव-गुरुजी, विजय मोरे, बाबा देसाई, बाजीराव पाटील, बाबूराव देसाई, भूषण पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. संजय मंडलिक म्हणाले, कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसची भाकरी करपून काळी ठिक्कर पडली असून, ती परतावीच लागणार आहे.
आ. सत्यजित पाटील-सरुडकर म्हणाले, समितीमधील भ्रष्टाचारात कॉँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच जनसुराज्य हाही या पापाचा भागीदार आहे.
आ. प्रकाश आबिटकर म्हणाले, सर्वसामान्यांचे पॅनेल एका बाजूला, तर चमचेगिरी करणाऱ्यांचे पॅनेल दुसऱ्या बाजूला, अशी स्थिती आहे. पीक कर्जातील पाच टक्के कपातीचा निर्णय चुकीचा आहे.
आ. चंद्रदीप नरके, सुरेश हाळवणकर, आ. अमल महाडिक, सुजित मिणचेकर, अमरीश घाटगे, आ. उल्हास पाटील, महेश जाधव यांचीही भाषणे झाली. संजय पवार यांनी प्रास्ताविक केले. सुनील मोदी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी उमेदवारांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अरुण नरके आमच्यासोबत
अरुण नरके, सदाशिव चरापले, अमरसिंह पाटील यांच्यासह सुज्ञ मंडळींचा आमच्या पॅनेलला पाठिंबा असल्याचे मंडलिक यांनी सांगितले.
‘एवाय’ म्हणजे एरंड
वाळवंटात फक्त एरंडच उगवतो; त्यामुळे पर्याय नसल्याने लोक त्याची महावृक्ष म्हणून पूजा करतात, तशीच राष्ट्रवादीची अवस्था आहे. जिल्हाध्यक्षपदाला माणूस मिळेना म्हणून ए. वाय. पाटील यांची निवड झाल्याची खिल्ली मारुती जाधव-गुरुजी यांनी उडविली.