जलवाहिनी बदलाचे काम अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: May 14, 2015 23:59 IST2015-05-14T23:02:12+5:302015-05-14T23:59:52+5:30
साडेआठ कोटी खर्चाची योजना : जयसिंगपुरात वितरण व्यवस्था सक्षम करण्याचा पालिकेचा प्रयत्न

जलवाहिनी बदलाचे काम अंतिम टप्प्यात
जयसिंगपूर : शहरवासीयांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी नगरपालिकेकडून पाठपुरावा सुरू आहे. शिवाय ‘युआयडीएसएसएमटी’ योजनेंतर्गत शहरात पाणी वितरणासाठी नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या योजनेनुसार शहराची संपूर्ण पाणी वितरण व्यवस्था तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणार आहे.दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येस व उपनगरांना पाणी व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. शासनाच्या ‘युआयडीएसएसएमटी’ या योजनेंतर्गत गेल्या पाच महिन्यांपासून शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू होते. हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. राजीव गांधीनगर, प्रियदर्शनी कॉलनी, दत्त कॉलनी, समडोळे मळा, खामकर कॉलनी, दीपनगर आणि शहरात जेथे पेव्हिंग ब्लॉक बसविले आहेत, त्या भागात नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आहे. शिवाय शहरात अनेक ठिकाणी असणाऱ्या आणि तांत्रिक अडचण ठरणाऱ्या पाणी व्हॉल्व्हची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे एका भागाला एकाच व्हॉल्व्हमधून पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नगरपालिकेकडून पाण्याचे योग्य नियोजन साधले जात असतानाच शहराला मुबलक पाणीपुरवठा व २४ तास पाणी मिळावे, यासाठी नव्याने साडेआठ कोटी रुपये खर्चाची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. यामुळे येणाऱ्या काळात शहरवासीयांना निश्चित मुबलक पाणी मिळणार आहे. (प्रतिनिधी)