कुरुंदवाड पालिकेत डांगेंचे ‘कमळ’ फुलणार का?
By Admin | Updated: September 6, 2016 01:16 IST2016-09-05T23:12:17+5:302016-09-06T01:16:55+5:30
भाजपची ताकद वाढली : काही प्रभागात दलित, मुस्लिम समाजाची मते निर्णायक

कुरुंदवाड पालिकेत डांगेंचे ‘कमळ’ फुलणार का?
गणपती कोळी --कुरुंदवाडमधील डांगे गटाचे नेते रामचंद्र डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने सध्यातरी शहरात भाजपची ताकद वाढली आहे. आगामी पालिका निवडणुकीत राजकीय लाभ घेण्यासाठी भाजपने डांगे यांना आपल्या पक्षात घेण्यात यश मिळविले असले, तरी गत निवडणुकीतील घटक डांगे यांच्या पाठीशी राहणार का? हा मोठा प्रश्न आहे. या घटकांमध्ये परिवर्तन करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असून, डांगे यांच्यामुळे पालिकेत कमळ दिसेल, मात्र फुलेल का? या प्रश्नाचे उत्तर निवडणुकीनंतरच मिळणार आहे.
शहरात रावसाहेब पाटील, जयराम पाटील व रामचंद्र डांगे असे तीन प्रमुख गट आहेत. या गटांभोवतीच पालिकेचे राजकारण फिरत असते. पालिकेच्या गत निवडणुकीत डांगे यांनी शहरातील आघाडी राजकारणाला फाटा देत प्रथमच राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवून पक्षीय राजकारणाला सुरुवात केली. त्यांच्या विरोधात दोन पाटील एकत्र येऊन आघाडी केली होती.
या चुरशीच्या निवडणुकीत १७ पैकी राष्ट्रवादीच्या डांगे यांनी आठ जागा जिंकून आपली ताकद दाखविली होती, तर विरोधी आघाडीला नऊ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी रावसाहेब पाटील यांच्या शहर सुधारणा आघाडीला सहा व जयराम पाटील यांच्या जनविकास आघाडीला तीन जागा मिळाल्या होत्या.
नगरसेवक व आघाडी नेत्यांच्या सोयीच्या राजकारणामुळे पालिकेत सत्तापालट होत राहिला. गतवर्षी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत सोयीची भूमिका घेतल्याने जिल्हा राष्ट्रवादीने डांगे यांना पक्षातून काढून टाकले होते. हीच वेळ साधत भाजपने डांगे यांच्या माध्यमातून शहरात भाजप सक्षम करण्यासाठी त्यांना आपल्या पक्षात ओढले.
डांगे यांच्या व्यक्तिगत गटाची ताकद आहे, शिवाय गत निवडणुकीत दलित, मुस्लिम समाजाची ताकद मिळाल्याने डांगे यांना चांगल्या जागा मिळविता आल्या. मात्र, डांगे यांनी भाजपमध्ये जाऊन आगामी निवडणूक कमळ चिन्हावरच लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील काही प्रभागात दलित, मुस्लिम समाजाची मते निर्णायक आहेत. या घटकांवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे डांगे यांना या घटकातील मतांमध्ये परिवर्तन करण्याचे मोठे आव्हान आहे.
डांगे यांना स्वत:च्या हक्काच्या प्रभागामधून पालिकेत कमळ नेण्यात यश येईल. मात्र, कमळ फुलविण्यात ते कितपत यशस्वी होतील हे निवडणुकीनंतरच कळणार आहे.