के.पी. यांच्या विरोधात कोण आणि किती?
By Admin | Updated: June 15, 2014 01:47 IST2014-06-15T01:44:24+5:302014-06-15T01:47:56+5:30
महायुतीचा निर्णयही कठीण : सदाशिवराव मंडलिक यांची भूमिका महत्त्वाची ठरणार

के.पी. यांच्या विरोधात कोण आणि किती?
संजय पारकर / राधानगरी
राधानगरी विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीतील महायुती किती एकसंघ राहणार यावरच येथील निवडणूक रंगणार आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार के. पी. पाटील यांच्या विरोधात जेवढे जास्त उमेदवार असतील, तितके त्यांच्या फायद्याचे ठरते, असे यापूर्वी सिद्ध झाले आहे. महायुतीची मोट बांधण्यात यश मिळण्याबरोबर काँग्रेसमधील बंडखोरांची संख्या कमी झाल्यास के. पी. पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होऊ शकते. दरवेळी भाकरी फिरवण्याचा येथील शिरस्ता गतवेळी दुसऱ्यांदा विजयी होऊन के. पीं.नी मोडला. यावेळी हॅट्ट्रिक करण्याचा त्यांचा इरादा तडीस जाणार का? याबद्दल औत्सुक्य आहे.
राधानगरी विधानसभा मतदारसंघाची भौगोलिक रचना मोठी असून, त्यामध्ये संपूर्ण राधानगरी व भुदरगड तालुका तसेच आजरा जिल्हा परिषद मतदारसंघाचा समावेश आहे. मतदारसंघाचे नाव राधानगरी असले तरी प्रमुख इच्छुक हे भुदरगड तालुक्यातील आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार के. पी. पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. महायुतीतून प्रकाश आबिटकर यांच्यासाठी माजी खासदार सदाशिवराव मंडलिक आग्रही असतील. भुदरगड तालुक्यातील काँग्रेस ही माजी आमदार बजरंग देसाई, दिनकरराव जाधव यांच्यात विभागली आहे. त्यांची भूमिका काय राहणार हे के. पी. पाटील यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. राधानगरी तालुक्यातून ए. वाय. पाटील यांच्यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत, तर स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील इच्छुक आहेत.
लोकसभेला संजय मंडलिक यांच्या रूपाने शिवसेनेचा तगडा उमेदवार मिळाल्याने यावेळी प्रथम विजयी व पराभूूत उमेदवारातील मतांचा फरक कमी झाला. देशभर मोदी लाटेचा परिणाम झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसला, तरीही येथे राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांना सुमारे २४ हजारांचे मताधिक्य मिळाले. मात्र, यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर धनंजय महाडिक यांच्या वैयक्तिक करिष्म्याचा वाटा आहे. या मताधिक्यावरून कलगीतुरा पाहता विधानसभेला ही स्थिती बदलणार हे निश्चित आहे.
देशात भाजपचे सरकार आल्याने राज्यातही वाहत असलेले बदलाचे वारे यामुळे महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. महायुतीत जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद लक्षणीय आहे. या पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, राधानगरीचे उपसभापती अजित पोवार दावेदार आहेत. शिवसेनेमध्ये सुरुवातीपासून सक्रिय असणारे तानाजी चौगले, प्रवीण सावंत यांचीही चर्चा आहे. गतवेळी अपक्ष लढून लक्षणीय मते मिळवून चर्चेत आलेले प्रकाश आबिटकर हे माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे खंदे समर्थक आहेत. संजय मंडलिक यांची लोकसभेची मते ९३ हजारांपर्यंत पोहोचण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. गतवेळी पराभूत होऊनही विधानसभा डोळ््यांसमोर ठेवूनच त्यांची वाटचाल राहिली आहे. महायुतीच्या उमेदवारीसाठी मंडलिक ताकद पणाला लावण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी ए. वाय. पाटील यांच्या नावाची चर्चा होते. त्यांच्या काही समर्थकांनी उघडपणे ही मागणी केली आहे. तरीही के. पी. व त्यांच्यातील नाते सत्ताकेंद्राची पद्धतशीरपणे केलेली वाटणी पाहता के. पी. हेच पुन्हा उमेदवार असणार आहेत. मोठी विकासकामे केल्याचा त्यांचा दावा आहे. मतदारसंघात चांगला संपर्क, तिन्ही तालुक्यांत पक्षाची मजबूत फळी या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. शिवाय परिस्थितीनुसार योग्य त्या माणसांना हाताळण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. राधानगरी तालुक्यात काही प्रमाणात अस्तित्व असलेला शेतकरी कामगार पक्ष, जनता दल पक्षांना त्यांनी यापूर्वीच आपलेसे केले आहे. गटबाजीमुळे खीळखीळ झालेल्या काँग्रेसमध्ये एकवाक्यतेचा अभाव हीच येथील राष्ट्रवादी काँग्रेसची जमेची बाजू आहे. राधानगरीत उदय पाटील-कौलवकर, अरुण डोंगळे, सदाशिवराव चरापले, विजय मोरे, हिंदुराव चौगले, अभिजित तायशेटे असे दिग्गज आहेत; पण प्रत्येकाचे स्वतंत्र गट आहेत. भुदरगडमध्ये माजी आमदार बजरंग देसाई, दिनकरराव जाधव यांच्यात काँग्रेस विभागली आहे.
यापैकी अनेकजण विधानसभेसाठी इच्छुक आहेत. राज्यातील आघाडी कायम राहिल्यास येथे त्यांना अपक्षच लढावे लागणार आहे. तरीही त्यांच्यात एकमत झाल्यास ते मोठे आश्चर्य ठरणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या भूमिकेलाही मोठे महत्त्व असणार आहे. आमदार महादेवराव महाडिक समर्थकांची संख्याही बऱ्यापैकी आहे. त्यांच्यासह खासदार धनंजय महाडिक यांच्या भूमिकाही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
(उद्याच्या अंकात शाहुवाडी मतदारसंघ)