‘कोकण’ एस.टी. ‘सीबीएस’मधून सोडा
By Admin | Updated: January 13, 2015 00:51 IST2015-01-13T00:28:13+5:302015-01-13T00:51:04+5:30
चंद्रकांतदादांची सूचना : निर्णय स्वागतार्ह - नीतेश राणे

‘कोकण’ एस.टी. ‘सीबीएस’मधून सोडा
कोल्हापूर : संभाजीनगर येथून कोकणात जाणाऱ्या व येणाऱ्या एस. टी. बसेस पुन्हा मध्यवर्ती बसस्थानकातून (सीबीएस) सोडण्याच्या सूचना आज, सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. ताराबाई पार्क येथील सर्किट हाऊस येथे ही बैठक झाली. याप्रसंगी जिल्हाधिकारी राजाराम माने उपस्थित होते.
शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एक जानेवारीपासून कोकणातील एस. टी. संभाजीनगर येथून सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये मालवण, सावंतवाडी, पणजी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, राधानगरी, देवगड, गगनबावडा डेपोच्या गाड्या, विजयदुर्ग या प्रमुख गाड्यांतील प्रवाशांना शहरात येण्यासाठी संभाजीनगर येथे उतरावे लागत होते. येथून शहरात येण्यासाठी प्रवाशांना १० रुपये ते ८० रुपये आर्थिक भुर्दंड बसत होता. त्यामुळे हा निर्णय बदलावा अन्यथा १५ जानेवारीपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार नीतेश राणे यांनी दिला होता. त्याचबरोबर अनेक प्रवासीही हा निर्णय बदला, अशी मागणी करत होते. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री यांनी आज महामंडळाचे कोल्हापूर विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून घेत पुन्हा मध्यवर्ती बसस्थानक येथून गाड्या सोडाव्यात, अशा सूचना दिल्या. त्यामुळे कोकणातील दहा गाड्या आता संभाजीनगर बसस्थानक येथे न थांबता मध्यवर्ती बसस्थानक येथे येतील, पुन्हा येथूनच कोकणात जातील. या गाड्या संभाजीनगर बसस्थानक ावरून रिंगरोड, सायबर चौक, विद्यापीठ कॉर्नर, मिलिटरी कँटिन, रेल्वे फाटक, ताराराणी चौकामार्गे मध्यवर्ती बसस्थानकात येतील व याच मार्गने पुन्हा संभाजीनगर स्टँड येथून कोकणात जातील. बैठकीस विभाग नियंत्रक सुहास जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी पी. व्ही. पाऊसकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूर येथे जाणाऱ्या एस.टी. गाड्या पुन्हा मुख्य बसस्थानकात नेण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. येथील जनतेच्या हितासाठी आंदोलन करण्याबरोबरच कोणत्याही स्तरावर जाण्याची आपली तयारी आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी या समस्येबाबत आपण सोमवारी बोललो होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेवर होणारा अन्याय कधीही खपवून घेणार नाही. इतर जिल्ह्यातील जनतेला जो न्याय दिला जाईल, तोच न्याय येथील जनतेला मिळायला हवा. भविष्यात यासाठी आपण आग्रही राहणार आहे.
- नीतेश राणे, आमदार