लस वाया न घालविण्याचे कोल्हापूरचे प्रयत्न यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:31 IST2021-04-30T04:31:11+5:302021-04-30T04:31:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : एकीकडे कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा भासत असताना, काही जिल्ह्यांमध्ये लस वाया जात असल्याचे शासनाच्या ...

लस वाया न घालविण्याचे कोल्हापूरचे प्रयत्न यशस्वी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : एकीकडे कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा भासत असताना, काही जिल्ह्यांमध्ये लस वाया जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते. तयानंतर दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करत कोल्हापूर जिल्ह्याने लस वाया जाण्याचे प्रमाण कमी करण्यात यश मिळवले आहे.
एक महिन्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील लस वाया जाण्याचे प्रमाण हे २ टक्के होते. याचवेळी अन्य जिल्ह्यांचे प्रमाणही खूपच होते. याची महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दखल घेतली होती व हे प्रमाण तातडीने कमी करण्याबाबत लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यांचे पालन करत पंधरा दिवसांपूर्वी हेच प्रमाण १.२ टक्क्यांवर आणण्यात आले. यामध्ये पुन्हा सुधारणा करत आता हे प्रमाण ०.१ टक्का इतके खाली आणण्यामध्ये कोल्हापूरच्या आरोग्य विभागांना यश आले होते. त्याहीपुढे जात गुरुवारी हेच प्रमाण वजा २ इतके घटले आहे.
राज्यातील २७ एप्रिलचा आढावा घेता, भंडारा, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई, नागपूर, नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे. रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि ठाणे या जिल्ह्यांनी कोल्हापूरपेक्षाही चांगली कामगिरी केली आहे. राज्याचे सरासरी लस वाया जाण्याचे प्रमाण ०.६ टक्के आहे. कोल्हापूरचे २७ एप्रिलचे हेच प्रमाण ०.१ इतके आहे.
चौकट
लसीचा तुटवडा असताना अशा पध्दतीने लस वाया जाणे हे चुकीचे आहे, याची जाणीवजागृती करण्यात आली. परिचारिकांनीही याला साथ दिली. त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. लस देण्यासाठी एडी इंजेक्शनचा वापर सुरू करण्यात आला. त्यामुळे आवश्यक तेवढीच लस भरली जाते. त्यामध्ये हवेचे बुडबुडे तयार होत नाहीत. या सगळ्यामुळे कोल्हापूर जिल्हा २ टक्के लस वाया जाण्यावरून १.२ टक्क्यावर आला. नंतर यामध्ये पुन्हा काटेकोरपणा आणल्याने आज ०.१ टक्का, आता ताज्या अहवालानुसार वजा २ इतकीच लस वाया जाते, असे लसीकरण मोहिमेचे समन्वयक डॉ. फारूक देसाई यांनी सांगितले.