कोल्हापूरला आता टँकरचा आधार!
By Admin | Updated: May 9, 2016 00:35 IST2016-05-09T00:21:41+5:302016-05-09T00:35:30+5:30
शहरालाही टंचाई : पाऊस लांबल्यास नियोजन

कोल्हापूरला आता टँकरचा आधार!
भीमगोंडा देसाई --कोल्हापूर राज्यात ‘टँकरमुक्त’ म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ख्याती होती. मात्र, यंदा नियोजनातील विस्कळीतपणामुळे इचलकरंजी, कोल्हापूर शहरात काही दिवस टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सद्य:स्थितीमध्ये रोज जिल्ह्यात कुठेही टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही; पण टंचाईग्रस्त शहरे व वाड्या-वस्त्यांत टंचाई निवारण कृती आराखड्यात पारंपरिक स्रोतांमध्ये पाणी उपलब्ध होईपर्यंत टँकरद्वारे पाणी देणे प्रस्तावित आहे.
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. विहिरी, कुपनलिका, तलाव यातील पाण्याने तळ गाठला आहे. उपसा बंदी करून शेतीसाठीच्या पाणी वापरावर निर्बंध आणले आहेत. पिण्यासाठी पाणी राखीव ठेवले आहे. सन २०११ नंतर जिल्ह्णात कुठेही शासनातर्फे टँकरने पाणीपुरवठा केलेला नाही. त्यामुळे राज्यात कोल्हापूरची ओळख ‘टँकरमुक्त’ म्हणून निर्माण झाली. मात्र, जवळपासचे सर्व नैसर्गिक स्रोत आटल्यानंतर टँकरने पाणीपुरवठा करण्याचा उपाय प्रस्तावित केले आहेत. कोल्हापूर शहरातील अनेक भागात काही दिवसांपासून सुरू असलेली गळती काढण्याचे काम सुरू राहिले. त्यादरम्यान पाणीपुरवठा बंद असलेल्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा महानगरपालिका प्रशासनाने केले. इचलकरंजी शहरातही काही भागांत टँकरने पाणी पुरविले. कुपनलिका खुदाई करून टँकर बंद करण्यात आला. पाऊस लांबल्यास गडहिंग्लज, मलकापूर, पन्हाळा यासह सर्वच तालुक्यांतील गावे, वाड्या, वस्त्यांतील पारंपरिक पाण्याचे स्रोत बंद पडल्यानंतर टँकरने पाणीपुरवठा करणे प्रस्तावित आहे. त्यामुळे सहा वर्षांपासून सलग राज्यात ‘टँकरमुक्त जिल्हा’ म्हणून नावलौकीक मिळविलेल्या कोल्हापूर जिल्ह्णाला यंदाच्या दुष्काळाने टँकरने तहान भागविण्याची वेळ आणली आहे.