कोल्हापूर बोर्ड बनले ‘आॅनलाईन’

By Admin | Updated: January 10, 2015 00:21 IST2015-01-09T23:24:34+5:302015-01-10T00:21:30+5:30

एका ‘क्लिक’वर माहिती : मुख्याध्यापक, लिपिकांना एसएमएस

Kolhapur Board becomes 'online' | कोल्हापूर बोर्ड बनले ‘आॅनलाईन’

कोल्हापूर बोर्ड बनले ‘आॅनलाईन’

संतोष मिठारी - कोल्हापूर -जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांत असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांपर्यंत परीक्षा, निकाल, आदींबाबतची परिपत्रके आता एका ‘क्लिक’वर मिळणार आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (बोर्ड) कोल्हापूर विभागाने परिपत्रके ‘आॅनलाईन’ पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची पहिली पायरी म्हणून विभागाचे संकेतस्थळ डिसेंबर २०१४ पासून सुरू केले आहे. कोल्हापूर विभागात कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांचा समावेश आहे. विभागीय मंडळाशी २ हजार ४०० शाळा आणि ६०० कनिष्ठ महाविद्यालये संबंधित आहेत. त्यांना परीक्षेचे अर्ज भरणे, वेळापत्रक पाठविणे, विविध बैठकांची माहिती देण्यासाठी तीन हजार परिपत्रिकांची छपाई करावी लागते. त्यानंतर संबंधित परिपत्रके पोस्टाद्वारे शाळा व महाविद्यालयांना पाठवावी लागतात. या प्रक्रियेत बराच वेळ, पैसा आणि श्रम वाया जातात. ते लक्षात घेऊन परिपत्रके आॅनलाईन पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी े२२ू.ुङ्मं१‘िङ्म’ँंस्र४१.्रल्ल हे स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले आहे. त्याद्वारे परिपत्रके पाठविण्यात येतील. त्यासाठी शाळांचे ई-मेल तसेच मुख्याध्यापक, लिपिकांचे मोबाईल क्रमांक संकलित केले जात आहेत. परिपत्रके आॅनलाईन पाहण्याची शाळांना सवय व्हावी यासाठी वर्षभर त्यांना ‘एसएमएस’ पाठविले जातील.


मोजक्या सूचनांची यंदा अंमलबजावणी!
दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहा मिनिटे प्रश्नपत्रिका लवकर द्यावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील परीक्षा केंद्र द्यावे, अशा सूचना केल्या आहेत. या परीक्षांसाठी महिना उरला आहे. अशा स्थितीत मंत्री तावडे यांनी केलेल्या सूचनांपैकी ज्या शक्य होतील, त्यांचीच अंमलबजावणी यंदा होणार आहे. सूचनांच्या अंमलबजावणीचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या समितीवर अवलंबून असणार आहे.
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २६ मार्च, तर दहावीची परीक्षा ३ मार्च ते २६ मार्चदरम्यान होणार आहे. प्रश्नपत्रिकांची छपाई पूर्ण झाली असून, केंद्राची निश्चिती, संचालक, शिक्षक, आदींच्या बैठकींची तयारी शिक्षण मंडळाकडून सुरू आहे. शिक्षक विद्यार्थी सराव, पूर्वपरीक्षा तसेच प्रात्यक्षिकांच्या तयारीत गुंतले आहे. यातच शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात शिक्षणमंत्री तावडे यांनी विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ नये विविध सूचना सुचविल्या आहेत.
यातील घराजवळील परीक्षा केंद्र देणे यंदा प्रत्यक्षात शक्य होणार नसल्याचे परीक्षाविषयक तसेच शिक्षणक्षेत्राशी संबंधित काही लोकांनी सांगितले. शिवाय, प्रश्नपत्रिका दहा मिनिटे आधी देण्याची अंमलबजावणी करता येईल. पण, विद्यार्थांना आणखी किमान अर्धा तास वर्गात घ्यावे लागणार आहे. त्याचा परिणाम पेपरचा कालावधी वाढण्यावर होणार असल्याचे काही शिक्षकांनी सांगितले.


यापूर्वी परिपत्रके पाठविण्यात बराच वेळ लागायचा; त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना याबाबत काही शंका, अडचणी असल्यास त्यांच्या सोडवणुकीसाठी विलंब होत होता. शिवाय एक परिपत्रक पाठविण्यास किमान दहा रुपयांचा खर्च व्हायचा. वर्षभरात विभागाचा परिपत्रकांवरील खर्च लाखोंच्या घरात पोहोचत होता. सर्वच शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये संगणक आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे परिपत्रके आॅनलाईन पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. महिन्याभरात ही प्रक्रिया सुरू होईल.
- शरद गोसावी, सचिव, कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळ

शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या सूचना विद्यार्थिहिताच्या आहेत. संबंधित सूचना शिक्षण मंडळाच्या विविध समित्यांसमोर ठेवण्यात येतील. त्यातील निर्णयानुसारच या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल. परीक्षांसाठी अवघा महिना राहिला आहे. त्यामुळे समितीची बैठक लवकरच घेण्यात येईल. त्यातील निर्णय लवकरच जाहीर केले जातील.
- गंगाधर म्हमाणे, अध्यक्ष, राज्य मा.व उ.मा.शिक्षण मंडळ

Web Title: Kolhapur Board becomes 'online'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.