टोमॅटोचा राजा
By Admin | Updated: August 31, 2015 23:04 IST2015-08-31T23:04:38+5:302015-08-31T23:04:38+5:30
कृषिक्रांतीचे शिलेदार

टोमॅटोचा राजा
एक काळ असा होता की, जगातील अनेक देशांत टोमॅटोला विषारी फळ समजले जात असे. आज मात्र टोमॅटो आणि टोमॅटोयुक्त पदार्थांशिवाय अनेकांचे जेवण पूर्ण होत नाही. टोमॅटो सॉस असल्याशिवाय पिझ्झा, बर्गर, चायनीज पदार्थांप्रमाणेच आजकाल भजीसुद्धा खाल्ली जात नाहीत. टोमॅटोचा आहारात वापर सुरू झाला; पण टोमॅटो लवकर खराब होणारे फळ भाजी वर्गात मोडणारे असल्याने त्याचा उपयोग ऋतुमानाप्रमाणे होत असे. टोमॅटो निर्जंतुकपणे साठविण्याची पद्धती विकसित करणारे आणि भारतासह अनेक देशांत प्रत्यक्ष जाऊन अन्नाची नासाडी थांबविण्यासाठी संशोधन करण्यात आयुष्य खर्ची घालणारे संशोधक म्हणजे डॉ. फिलिप नेल्सन.
फिलिप यांचा जन्म १९३४ मध्ये इंडियाना या अमेरिकन प्रांतात मॉरिसटाऊन येथे झाला. वडिलांची ५०० एकर शेती होती. फिलिप त्या शेतातच वाढले. लहानपणापासून शेतातील विविध उत्पादनाचे पॅकिंगसाठी फिलिप मदत करीत असत. पीक आल्यावर त्याची काढणी आणि मळणी करायलाही त्यांना आवडायचे. त्यांच्या वडिलांची अन्नपदार्थ, विविध पिकांच्या फळांचे डबाबंद (कॅनिंग) पॅकिंगसाठी ब्ल्यू रिव्हर पॅकिंग कंपनी होती. इथे ते काम करायचे. विषेशत: टोमॅटोच्या पॅकिंगसाठी सुमारे तीनशे कामगार काम करायचे. त्यांचे शालेय शिक्षण मॉरिसटाऊन येथे झाले. पुढे वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी पर्ड्यू विद्यापीठात विस्तार कार्याच्या अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेतले.
इंडियाना राज्यात कृषी प्रदर्शन भरले होते. त्या प्रदर्शनात फिलिप यांनी पिकविलेले टोमॅटोचे २४ प्रकार ठेवले. त्यांच्या या टोमॅटोंना ४ एच पारितोषिक मिळाले आणि फिलिप यांना ‘टोमॅटोचा राजा’ हा किताब देऊन गौरविण्यात आले. पुढे १९५६ मध्ये फिलिप यांनी कृषिशास्त्रात बी.एस. ही पदवी पर्ड्यू विद्यापीठातून मिळविली. त्यानंतर ब्ल्यू रिव्हर पॅकिंग कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम सुरू केले; पण टोमॅटोचे उत्पादन खूपच घटल्यामुळे प्रामुख्याने टोमॅटो पॅकिंग करणारी ही कंपनी बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यांनतर फिलिप यांना पर्ड्यू विद्यापीठात अर्धवेळ नोकरी मिळाली. ते फलोद्यान विभागाचे काम पाहत. त्यांनी १९६७ मध्ये याच विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळविली. अन्नघटकांचा कालानुरूप स्वाद जाणे व टोमॅटोचे हवाबंद पद्धतीने स्वादासह टिकविणे हा त्यांचा विषय होता. या अभिनव संशोधनाने त्यांना कायम नोकरी मिळाली. याच विद्यापीठात त्यांनी ५० वर्षे नोकरी केली. मे, २०१०मध्ये लौकिकार्थाने सेवानिवृत्त झाले; मात्र आजही ते मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
सन १९७० मध्ये नॅशनल अकॅडमी आॅफ सायन्सच्या माध्यमातून अन्नधान्याची नासाडी रोखण्यासंदर्भात संशोधनासाठी फिलिप भारतात आले. त्या काळात भारतात उत्पादित होणाऱ्या अन्नधान्यांपैकी ५० टक्के अन्न नासाडीमुळे वाया जात असे. फिलिप यांनी तंत्राद्वारे अन्नाची नासाडी थांबविण्याचे ज्ञान विकसित राष्ट्रांना दिले. त्यामुळे अन्नाची साठवणूक तंत्र आणि वितरण शक्य झाले. त्यांनी विविध धातूंच्या डबाबंद पॅकिंगसाठी ४० लाख लिटरच्या टाक्या तयार केल्या. अन्नाच्या निर्जंतुकीकरणाचे तंत्रही विकसित केले. यासाठी त्यांनी सछिद्र कंटेनर निर्माण केले. शीतकरण व सुयोग्य तापमान निश्चिती केली. अन्न, फळे आणि भाज्या सुखरूप पाठविण्यासाठी जहाज रचना केल्या. या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे १९९५मध्ये ‘निकोलाज अॅपर्ट’ पारितोषिक देऊन कौतुक झाले. अन्न प्रक्रियेबाबतचे सर्वांत महत्त्वाचे वर्ल्ड फुड प्राईज २००७ मध्ये मिळाले. आजही ते पर्ड्यू विद्यापीठात आपल्या संशोधन कार्यात मग्न आहेत.
- डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.