कोल्हापूर : मे महिन्यापासूनच ज्या पद्धतीने ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे, ते पाहता जिल्ह्यास महापुराचा धोका आहे. पावसाच्या प्रमाणात हिप्परगी बंधारा आणि अलमट्टीमधील पाण्याचा विसर्ग ठेवला तर हा धोका टळणार आहे त्यामुळे विसर्गावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा, त्यासाठी दोन्ही ठिकाणी निवृत्त नको तर सेवेत असलेल्या तज्ज्ञ अभियंत्यांची नियुक्ती करा. पूर आल्यानंतर पळापळ करण्याऐवजी तो येऊच नये यासाठीच्या उपाययोजना करा अशा सक्त सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अमल महाडिक, अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, स्मिता माने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.
आबिटकर म्हणाले, १५ ऑगस्टपर्यंत अलमट्टीतील पाणीसाठा ५१७ मीटर राहील आणि पावसाचा जोर वाढला की हिप्परगी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे खुले होतील या दोन्ही बाबींवर लक्ष ठेवले तरी पुराचा धोका कमी होणार आहे. राधानगरी, वारणा आणि कोयनेतील विसर्ग सुरू होत नाही तोपर्यंत धोका नाही.ढगफुटीसारखा पाऊस तासभर झाला तरी शहराचे तळे होते. या पुढेच असाच बेभरवशाचा पाऊस होणार हे गृहीत धरून धरण क्षेत्राबाहेर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी नालेसफाई करा, सखल भागात पाणी साठू नये याची काळजी घ्या.
धोकादायक ठिकाणी फलक, बॅरिकेड्सआमदार अमल महाडिक यांनी धोकादायक पूल, धबधब्यांच्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत अशी सूचना केली. त्यावर मंत्री आबिटकर यांनी महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींनी अशा ठिकाणी सूचना फलक लावावेत, रस्त्यावर ओढ्यांचे पाणी आल्यावर तेथून कोणी जाणार नाही ही जबाबदारी यंत्रणेची असेल. जिल्हाधिकारी येडगे यांनी सर्व पुलांची तपासणी केली जाईल असे सांगितले.
तातडीने कन्सल्टंट नेमामंत्री आबिटकर पाच वर्षांपूर्वी भूस्खलनाने मृत्यू झालेल्या गावांमध्ये काय उपाययोजना केल्या यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कन्सल्टंट नेमण्यात येणार असल्याचे सांगितले. यावर आबिटकर यांनी पाच वर्षांत काहीच काम केले नाही, उद्या नागरिकांनी विचारले तर काय उत्तर द्यायचे. जोतिबा, पन्हाळ्यासह हा धोका असलेल्या गावांच्या अभ्यासासाठी तातडीने कन्सल्टंट नेमा, ठिकाणे शोधून तेथे निर्धारित वेळेत भूस्खलन सौम्यीकरणाच्या उपाययोजना करा असे सांगितले.