कऱ्हाड-इचलकरंजी-बेळगाव रेल्वेमार्ग करा
By Admin | Updated: September 6, 2016 23:43 IST2016-09-06T23:11:49+5:302016-09-06T23:43:19+5:30
मंगलादेवी शिंदे : पंतप्रधानांसह रेल्वे मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली मागणी

कऱ्हाड-इचलकरंजी-बेळगाव रेल्वेमार्ग करा
आष्टा : पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील औद्योगिक विकासासाठी कऱ्हाड-इचलकरंजी-निपाणी-बेळगाव या नवीन रेल्वे मार्गाला केंद्र शासनाने तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी आष्ट्याच्या नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कऱ्हाड - इचलकरंजी - निपाणी- बेळगाव या रेल्वेमार्गाचे नुकतेच सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सुमारे १९१ किलोमीटर अंतर असून, २१०० कोटी रुपये खर्चाचा हा रेल्वेमार्ग आहे. या मार्गावरील कऱ्हाड, शेणोली, तांबवे, इस्लामपूर, वाळवा, आष्टा, दुधगाव, नेज, हातकणंगले, इचलकरंजी, हुपरी, कागल, आडी, निपाणी, कणंगला, संकेश्वर, हलकर्णी, हंडीगणूर, काकती, सांबरे व बेळगाव या गावातील विकासाला चालना मिळणार आहे. या मार्गावरील अनेक गावे कृषी, औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर आहेत. येथील उत्पादित मालाला बाजारपेठ मिळण्यास या मार्गामुळे मदत होणार आहे.
ग्रामीण भागातील शेतमाल शहराकडे नेण्यास जवळचा मार्ग उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचा वेळ, श्रम, पैसा वाचण्यास मदत होणार आहे. नवीन रेल्वेमार्गाची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या मार्गाच्या सर्व्हेचे काम नुकतेच पूर्ण झाले असल्याने पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील अनेक गावे जवळ येणार आहेत. त्यामुळे डिझेलची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. कऱ्हाड व बेळगाव जंक्शनमुळे विकासाला गती मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेची विकासात महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले आहे. येत्या अर्थसंकल्पात तातडीने मंजुरी देऊन या मार्गाचे काम लवकर सुरु करण्याची मागणी नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे यांनी पंतप्रधान, रेल्वेमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (वार्ताहर)
१९१ किलोमीटरच्या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण
कऱ्हाड-इचलकरंजी-बेळगाव या १९१ किलोमीटरच्या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण. खर्च सुमारे २१०० कोटी. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पासून जवळ असणाऱ्या या रेल्वे मार्गामुळे परिसराच्या विकासाला गती मिळणार.