कागलला पावसाचा तडाखा वादळी पावसाने झोडपले : मोठे नुकसान
By Admin | Updated: May 19, 2014 00:52 IST2014-05-19T00:50:51+5:302014-05-19T00:52:14+5:30
कागल : शहर आणि परिसराला काल, शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वादळी वार्याने जोरदार तडाखा देत खासगी आणि सार्वजनिक मिळून लाखो

कागलला पावसाचा तडाखा वादळी पावसाने झोडपले : मोठे नुकसान
कागल : शहर आणि परिसराला काल, शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वादळी वार्याने जोरदार तडाखा देत खासगी आणि सार्वजनिक मिळून लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान केले. सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नसली तरी झाडा- फांद्यांवर आसरा घेणारे पक्षी मात्र या वादळी वार्याच्या तडाख्यात मोठ्या संख्येने घायाळ आणि मृत झाले आहेत. वीजपुरवठा खंडित होऊन हा परिसर अंधारात बुडाला. आंबा, चिकू, केळी या फळझाडांबरोबरच अनेक ठिकाणी उसाचे पीकही कोलमडले आहे. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी आज दिवसभर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करीत होते. शनिवारी सायंकाळी सहा वाजता मुसळधार पाऊस कोसळला होता. त्यानंतर रात्री साडेदहा वाजता सोसाट्याचा वारा आणि विजा चमकू लागल्या. तब्बल तासभर हे वारे घोंघावत होते आणि अखंडपणे विजा चमकत होत्या. या वार्यामुळे अनेकांच्या घरांवरची कौले, पत्रे उडून गेले. बंगल्याच्या गॅलरीत बसविलेले ‘सोलर’ही कोलमडले. झाडांच्या फांद्या तुटल्यानेही नुकसान झाले. याच दरम्यान, अर्धा तास आडवा-तिडवा पाऊसही कोसळला. यामुळे आंबे, चिकू, केळीचे घड खाली पडून नुकसान झाले आहे. विद्युतपुरवठा करणार्या तारा तुटल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. वीज वितरण कार्यालयाने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण वीजपुरवठा खंडित केला. सिद्धनेर्ली-कागल येथे ११ केव्ही उच्च दाबाची वाहिनी तुटून पडली. हे अंतर अर्धा किलोमीटर होते; तर लघुदाबाचे १८ विद्युत खांब आणि त्यांच्या वाहिन्या तुटून वीज कंपनीचे आठ ते नऊ लाखांचे नुकसान झाले आहे. खासगी व्यक्तींचे ३० ते ३५ हजार रुपये किमतीचे ‘सोलर’, पत्रे, कौले, झाडे आणि फळे-पिके यांचेही मोठे नुकसान झाल्याने महसूल विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)