‘उत्तर’चा एकच आदेश, पुन्हा एकदा राजेश...!

By Admin | Updated: October 20, 2014 00:44 IST2014-10-20T00:15:15+5:302014-10-20T00:44:05+5:30

२२ हजार ४२१ चे मताधिक्य : शिवसेनेच्या झंझावातापुढे काँग्रेसचा दारुण पराभव

Just one order of 'answer', Rajesh again! | ‘उत्तर’चा एकच आदेश, पुन्हा एकदा राजेश...!

‘उत्तर’चा एकच आदेश, पुन्हा एकदा राजेश...!

पैसा की स्वाभिमान याचा फैसला करणाऱ्या कोल्हापूर उत्तरमधील निवडणुकीत कोल्हापूरच्या जनतेने स्वाभिमानाच्या बाजूने निकाल देत शिवसेनेच्या राजेश विनायक क्षीरसागर यांना तब्बल २२ हजार ४२१ इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून दिला. शिवसेनेच्या झंझावातापुढे काँग्रेस उमेदवार सत्यजित ऊर्फ नाना शिवाजीराव कदम यांचा टिकाव लागला नाही. क्षीरसागर यांचा हा सलग दुसरा विजय असून, त्यांनी आपला विजय हा स्वाभिमानी जनतेला तसेच सहकार्य करणाऱ्या शिवसैनिकांना अर्पण केला आहे.

भारत चव्हाण - कोल्हापूर
कोल्हापूर शहरातील मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात नेहमीच यशाचे झुकते माप टाकले आहे. राजेश क्षीरसागर यांचा विजय हा अपेक्षित मानला जात होता. त्यांनी गेल्या पाच वर्षांत केलेले काम, आंदोलनाच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर उठविलेला आवाज, चांगला जनसंपर्क याच्या जोरावर दुसऱ्यांदा मुसंडी मारली अन् हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
क्षीरसागर यांच्यासमोर काँग्रेसच्या सत्यजित कदम यांनी प्रचाराच्या माध्यमातून मोठे आव्हान उभे केले होते. हवा तापविली होती, परंतु हे आव्हान म्हणजे एक आभास होता हेच निकालावरून स्पष्ट झाले. कोल्हापूर उत्तरमधून दीर्घ काळानंतर निवडणूक रिंगणात उतरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महेश बाळासाहेब जाधव यांनी तब्बल ४० हजार १०४ मते घेऊन सर्वांचेच लक्ष वेधले, परंतु गेली पंधरा वर्षे राज्याच्या राजकारणावर प्रभाव पाडणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या राऊसाहेब खंडेराव तथा आर. के. पोवार यांना जनतेने चांगलेच फटकारले. आर. के. यांना केवळ ९,८८७ इतकी मते मिळाली.

मोदी, सोनियांचा प्रभाव शून्य
कोल्हापूर उत्तरमधील प्रचाराकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी व कॉँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी कोल्हापुरात सभा घेतल्या. विजयाबाबत उत्सुकता होती. मोदी यांच्या सभेमुळे मतदार भाजपच्या पारड्यात मते टाकतील, असा दावा केला जात होता, परंतु या दोन्ही नेत्यांचा प्रभाव मतदारांवर पडला नाही. उलट शिवसेनेला सहानुभूती होती हेच दिसून आले.


डाव्या पक्षांची वाताहत
शहरातील सर्वसामान्य जनतेच्या अनेक प्रश्नांवर सतत आंदोलनात आग्रही असणाऱ्या आणि श्रमिक, कष्टकऱ्यांसाठी झगडणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची या निवडणुकीत चांगलीच वाताहत झाली. भाकपच्या रघुनाथ कांबळे यांना या निवडणुकीत फक्त १,५०४ मते मिळाली. ‘एकेकाळचा बालेकिल्ला’ असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या मनीष महागावकर यांना तर केवळ १९९ मते पडली.


पहिल्या पाच फेरीतच चुरस
मतमोजणी सुरू झाली आणि पहिल्या फेरीतच शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी १५२८ इतक्या मतांची आघाडी घेऊन खाते उघडले. पहिल्या पाच फेऱ्यांत क्षीरसागर व कदम यांच्यात चुरस दिसली. सातव्या फेरीत कदमवाडी जाधववाडी भागातील मतदानयंत्रे लागताच क्षीरसागर यांचे मताधिक्य ३०० पर्यंत घसरले. घालमेल सुरू झाली, पण आठव्या फेरीनंतर क्षीरसागर यांनी कदम यांना मागे टाकण्यास सुरुवात केली. शेवटच्या २१ व्या फेरीवेळी हे मताधिक्य २२ हजार ४२१ वर जाऊन पोहोचले.
क्षीरसागर जिंकल्याची कारणे
टोल, एलबीटी आंदोलनात सक्रिय राहिल्याचा लाभ
गेल्या पाच वर्षांत जनसंपर्क चांगला ठेवला
महिला बचत गटांना व्यासपीठ उपलब्ध करून तरुणांचे शिवसेनेबद्दलचे आकर्षण
सत्यजित कदम यांच्या पराभवाची कारणे
टोल, एलबीटीवरून काँग्रेसविषयी तीव्र नाराजी
काँग्रेस नगरसेवक, कार्यकर्ते प्रचारापासून अलिप्त
शहराच्या सर्व भागांत पोहोचण्यात अडचणी
काँग्रेस नेत्यांकडून फसवणुकीची शक्यता
काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गायब
क्षीरसागर यांचे मताधिक्य घटत नाही, उलट ते वाढतच असल्याचे लक्षात येताच १५व्या फेरीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी कक्षातून काढता पाय घेतला. १९ व्या फेरीचा कल पाहून काँग्रेसचे मतमोजणी प्रतिनिधीही केंद्रातून बाहेर पडले. त्याच्या आधी भाजपचे प्रतिनिधीही बाहेर पडले होते. २० व २१ वी फेरी तर केवळ शिवसेनेच्या प्रतिनिधींसमक्षच मते मोजण्यात आली. राजेश क्षीरसागर यांचे मताधिक्य पहिल्या फेरीपासून वाढत होते, ते शेवटच्या फेरीपर्यंत वाढतच राहिले.

टपाली मतमोजणीतही राजेशच
टपाली मतांची मोजणी स्वतंत्र दोन टेबलांवर करण्यात आली. मतपत्रिकांची छाननी करून त्यांची मोजणी करण्यास विलंब लागला. सकाळी आठ वाजता सुरू झालेली ही मोजणी पूर्ण व्हायला दुपारचे बारा वाजले. एकूण ६०२ टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी ९५ मतपत्रिका अवैध ठरल्या, तर ५०७ मतपत्रिका वैध ठरल्या. त्यातील सर्वाधिक मते ही राजेश क्षीरसागर यांना १६० पडली. सत्यजित कदम यांना १५४, महेश जाधव यांना ५९, आर. के. पोवार २४, संभाजी देवणे, सुरेश साळोखे यांना प्रत्येकी ३, तर रघुनाथ कांबळे २ डी. श्रीकांत यांना १ अशी मते मिळाले.

Web Title: Just one order of 'answer', Rajesh again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.