गूळ नियमन अखेर कायम; चंद्रकांतदादा

By Admin | Updated: December 16, 2014 23:59 IST2014-12-16T23:54:44+5:302014-12-16T23:59:53+5:30

शेतकऱ्यांना दिलासा; बाजार समित्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

Jugs last forever; Chandrakant Dada | गूळ नियमन अखेर कायम; चंद्रकांतदादा

गूळ नियमन अखेर कायम; चंद्रकांतदादा

कोल्हापूर : गुळावरील रद्द केलेले नियमन कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने आज, मंगळवारी घेतला. पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, बाजार समित्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता पूर्ववत गूळ खरेदी व विक्रीवर बाजार समितीचा अंकुश राहणार आहे.
शेतकऱ्याला त्याने उत्पादित केलेला माल विकण्याची मुभा असावी, यासाठी कॉँग्रेस आघाडी सरकारने ३ मार्च २०१४ पासून गूळ, बेदाणा, रवा-मैद्यासह ड्रायफ्रूटवरील बाजार समित्यांचे नियमन काढून टाकले होेते. या निर्णयामुळे अडत्यांचा हस्तक्षेपच बंद झाला होता.
गूळ व बेदाणे वगळता इतर वस्तूंवर या निर्णयाचा फारसा परिणाम झाला नव्हता; पण कोल्हापूरमध्ये बहुतांश गूळ उत्पादक हे लहान शेतकरी आहेत. त्यामुळे त्यांना अडत्यांच्या माध्यमातूनच गुळाची विक्री करावी लागते. गुऱ्हाळघराच्या खर्चासाठी त्याला अडत्याकडूनच आगाऊ पैसे घ्यावे लागतात. शेतकरी-अडते-व्यापारी-बाजार समिती ही साखळी अचानक तुटल्याने गेले सहा महिने शेतकरी गोंधळून गेला होता. सांगली जिल्ह्यातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचीही नियमन कायम ठेवण्याची मागणी होती.
गूळ खरेदी-विक्रीवर समितीचा अंकुश राहिला नसल्याने मध्यंतरी काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे न देताच पोबारा केला होता. त्यामुळे गुळावरील नियमन कायम राहावे, यासाठी शेतकऱ्यांचा गेले सहा महिने रेटा होता. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी ही मागणी लावून धरली होती. त्यानंतर आज पणनमंत्री पाटील यांनी गुळावरील नियमन कायम ठेवण्याचे आदेश दिले.

गुऱ्हाळघर बंदला थंडा प्रतिसाद
गूळदराच्या झालेल्या घसरणीविरोधात सुरू केलेल्या ‘गुऱ्हाळ बंद’ आंदोलनाला शेतकऱ्यांकडून थंडा प्रतिसाद मिळत आहे. आज, मंगळवारी शाहूवाडी, पन्हाळा व करवीरमधील काही गुऱ्हाळघरे सुरू होती. त्याचबरोबर रात्री उशिरापर्यंत बाजार समितीत गुळाची आवक राहिली.
रविवारी झालेल्या गुऱ्हाळमालकांच्या बैठकीत काल, सोमवारपासून गुऱ्हाळघरे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता; पण या निर्णयाने गुऱ्हाळधारकांमध्येच उलटसुलट चर्चा सुरू आहे.
आज तब्बल ५९ हजार ७०० रव्यांची विक्री झाली. आजचे सौदे संपले तरी दुपारनंतर गुळाची आवक बाजार समितीत सुरूच होती. रात्री उशिराही समितीत गूळ येत होता. साधारणत: सायंकाळपर्यंत समितीत २० हजार गूळ रव्यांची आवक झाल्याचे समजते.
पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गूळ नियमन चालूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनी गुरुवारचा मोर्चा रद्द करून ‘गुऱ्हाळ बंद’ आंदोलनही मागे घ्यावे, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक रंजन लाखे यांनी केले.

Web Title: Jugs last forever; Chandrakant Dada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.