परिवर्तनाच्या लढाईत सामील व्हा
By Admin | Updated: January 12, 2015 00:37 IST2015-01-12T00:32:17+5:302015-01-12T00:37:09+5:30
पन्नालाल सुराणा : 'भविष्यातील राष्ट्रसेवादल व परिवर्तनाची लढाई' विषयावर परिसंवाद

परिवर्तनाच्या लढाईत सामील व्हा
कोल्हापूर : दुबळ्यांचे आर्थिक बळ वाढत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने परिवर्तन होणार नाही. त्यामुळे या लढाईत प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी आज, शनिवारी येथे केले.
भरत लाटकर गौरव समारंभानिमित्त मार्केट यार्डमधील मुस्कान लॉन येथे 'भविष्यातील राष्ट्रसेवादल व परिवर्तनाची लढाई' या विषयावरील परिसंवादात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रसेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य होते.
पन्नालाल सुराणा यांच्या हस्ते राष्ट्रसेवा दलाचा ध्वज लावून परिसंवादाचे उद्घाटन झाले. यावेळी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्याध्यक्ष शमशुद्दीन तांबोळी, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, बाबासाहेब नदाफ, भरत लाटकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सुराणा म्हणाले, परिवर्तन सत्तेच्या मार्गाने ज्यांना करायचे आहे त्यांना करू देत, परंतु आपण सेवादलाच्या माध्यमातून शिस्तीच्या चौकटीत राहून ते करायचे आहे. आपला हा विचार बहुजन समाजासाठी आहे. दलित व वंचितांना समाजात बरोबरीने स्थान मिळवून देण्याची जबाबदारी राष्ट्रसेवा दलावर आहे. भांडवलशाहीचे विदारक परिणाम सर्वांना भोगावे लागत आहेत. या विरोधात सर्वच राष्ट्रात चळवळ सुरू आहे. संपत्तीचे केंद्रीकरण व भांडवलदारांचा मदमस्तपणा या विरोधात सेवादलाला स्पष्ट भूमिका घ्यावी लागणार आहे. त्याचा तर्कशास्त्र पद्धतीने अभ्यास करावा लागणार आहे.
ते पुढे म्हणाले, सामाजिक विषमतेला सुरूंग लावायचा असल्यास दलितांना व वंचितांना आर्थिक सक्षम बनविले पाहिजे. यासाठी संघटना बांधण्याचे काम हाती घेतले पाहिजे. दलाच्या पाईकांनी कंबर कसून याद्वारे घराघरांत जाऊन प्रत्येकाला या परिवर्तनाच्या लढाईत सहभागी करून घेतले पाहिजे.
तांबोळी म्हणाले, हिंदुत्ववादी व ‘एमआयएम’ यांंच्यासारख्या सडलेल्या मेंदूतून येणाऱ्या भाषेमुळे सामाजिक अशांतता माजत आहे. अलीकडच्या काळात अशा घटना अनेक घडत असून त्याची यादी वाढत आहे. तीनवेळा बंदी घातलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यातच आता देशाची सत्ता आली आहे. अलीकडच्या पिढीत अराजक व धर्मांधपणा आला आहे. तो उखडून टाकण्यासाठी सामाजिक परिवर्तनाची गरज आहे.
डॉ. वैद्य म्हणाले, देशात सध्या भगव्या करमणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘कॉमेडी शो’प्रमाणे दररोज मोदी सरकारमधील मंत्र्यांकडून विनोद केले जात आहेत.
भगवत्गीतेला देशाचा राष्ट्रीय ग्रंथ करण्याची भाषा होऊ लागली आहे, परंतु ही क्षमता फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेमध्येच आहे. या घटनेची तुलना कुठल्याही धार्मिक ग्रंथाशी होऊ शकत नसल्याचे डॉ. वैद्य यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिवाजीराव परूळेकर, हुसेन जमादार, मनोहर नवनाळे, अशोक शेवडे यांच्यासह राष्ट्रसेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबासाहेब नदाफ यांनी प्रास्ताविक केले. शशिकांत मुद्दापुरे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)