‘आरोग्य’ योजनेपासून जयसिंगपूर वंचित ?
By Admin | Updated: August 30, 2015 23:03 IST2015-08-30T23:03:53+5:302015-08-30T23:03:53+5:30
पाठपुराव्याची गरज : लोकसंख्येच्या मर्यादेमुळे योजनेस अडचणी

‘आरोग्य’ योजनेपासून जयसिंगपूर वंचित ?
संदीप बावचे - जयसिंगपूर --लोकसंख्येच्या कारणावरून केंद्र शासन पुरस्कृत ‘राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान’पासून जयसिंगपूर शहर वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपालिकेकडून दोन वेळा शासनाच्या आरोग्य विभागकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. एक लाख लोकसंख्या असेल तरच ही योजना मंजूर होवू शकते असे, शासन पातळीवर सांगण्यात येत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज बनली आहे.
सन २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ५० हजारांपेक्षा जास्त असून केंद्राच्या सूचनेनुसार ज्या शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ५० हजारांपेक्षा जास्त आहे, अशा शहरांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येतो.
जयसिंगपूर शहराशी बहुतांश गावे निगडीत असल्यामुळे व्यापारी, शेतकरी, कामगार औषधोपचारासाठी येतात. सध्या शहर व परिसरातील नागरिकांची आरोग्य सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्र वगळता खासगी वैद्यकीय व्यवसायावर अवलंबून आहे. यामुळे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय शहर आरोग्य अभियान (एन.यू.एच.एम) राबविण्याबाबत पालिकेच्या विशेष सभेत ठराव केला होता.
सरासरी ५० हजार लोकसंख्येला एक अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर, असे या योजनेचे स्वरूप असून. एक वैद्यकीय अधिकारी, तर प्रत्येक दहा हजार लोकसंख्येला एक उपआरोग्य केंद्र व लॅबोरेटरी स्टोअर, स्वतंत्र कर्मचारी, नर्स, क्लार्क, आदीं असे नियोजन आहे. योजना शासकीय खर्चातून चालविली जाते. औषध पुरवठा केंद्र शासनाकडून होतो. या योजने अंतर्गत आरोग्य केंद्रात सुसज्ज लॅबोरेटरी, बाह्यरूग्ण सेवा, एक्स रे, औषधोपचार व पुरवठा केंद्र, तसेच दर आठवड्यास स्त्री रोग व बाल रोग तज्ज्ञ असे स्वरूप आहे. या योजनेवर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, मुख्याधिकारी यांचे नियंत्रण असते. योजनेसाठी जयसिंगपूर पालिकेने आरोग्य विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे.
योजना कोणासाठी ?
१५ आॅक्टोंबर २०१३ साली तत्कालीन केंद्रीय मंत्री गुलाब नबी आझाद यांनी योजना पुरस्कृत केली. शहर व ग्रामीण विभागासाठी कार्यान्वित करण्यात आली. नंतर शहरातील झोपडपट्टी, कामगार वसाहतीमधील नगारिकांसाठी तसेच कचरा गोळा करणारे, फेरीवाले, बांधकाम मजूर, वीटभट्टी कामगार यांच्या आरोग्याच्यादृष्टीने योजना शहरी भागात कार्यान्वित करण्यात आली आहे.
प्रस्ताव लालफितीत
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान ही योजना सध्या इचलकरंजी शहरात सुरू आहे. या धर्तीवरच जयसिंगपूर शहरात ही आरोग्य सेवा सुरू करण्यासाठी नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी यांच्याकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्ताव शासनाच्या लालफितीत अडकून पडला आहे.
५0 हजारांसाठी एक केंद्र
एक लाख लोकसंख्येसाठी दोन केंद्रे, असे शासनाचे धोरण आहे. शहराची लोकसंख्या ५० हजार गृहीत धरून एका केंद्राची मागणी प्रस्तावाद्वारे केली आहे. एक लाख लोकसंख्ये प्रमाणेच ही योजना मिळू शकते, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे, अशी माहिती प्रभारी उपमुख्याधिकारी एम. एस. चाबुकस्वार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.