जयंतराव, आॅक्टोबरमध्ये तुमचं खरं नाही राजू शेट्टी : विधानसभा निवडणुकीसाठी दिला इशारा
By Admin | Updated: May 19, 2014 00:23 IST2014-05-19T00:22:58+5:302014-05-19T00:23:21+5:30
इस्लामपूर : ‘जयंतराव, मी आता परमनंट खासदार झालो आहे. मी तुमचा राजीनामा मागणार नाही. येत्या तीन महिन्यांसाठी मंत्रीपदाचा उपभोग घ्या.

जयंतराव, आॅक्टोबरमध्ये तुमचं खरं नाही राजू शेट्टी : विधानसभा निवडणुकीसाठी दिला इशारा
इस्लामपूर : ‘जयंतराव, मी आता परमनंट खासदार झालो आहे. मी तुमचा राजीनामा मागणार नाही. येत्या तीन महिन्यांसाठी मंत्रीपदाचा उपभोग घ्या. आॅक्टोबरमध्ये तुमचं काही खरं नाही’, अशा शब्दात खा. राजू शेट्टी यांनी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना आव्हान दिले. येथील शासकीय विश्रामगृहावर खा. शेट्टी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, २00९ च्या पहिल्या निवडणुकीत येडेमच्छिंद्र येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन केल्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत लोकसभेत मराठी भाषेतूनच शेतकर्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची शपथ घेतली आहे. त्याप्रमाणे शेतकर्यांचे प्रश्न उपस्थित करुन ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नेते तन-मन-धनाने माझ्या पराभवासाठी एकत्रित आले होते. निवडणूक लढवता येऊ नये म्हणून ऊस आंदोलनावेळी खून, वाटमारी, दरोडे असे गुन्हे दाखल केले. नुकसान भरपाईचा कायदा लावला. मात्र त्यांच्या या सगळ्या डावपेचानंतरही निवडणुकीचा मार्ग सुकर करुन घेतला. तडजोडीचे आरोप करीत राष्ट्रवादीच्या चमच्यांनी माझे पुतळे जाळले. मात्र माझा विचार ते जाळू शकत नाहीत. जनता हेच माझे सर्वोच्च न्यायालय आहे. माझा निर्णय जनतेनेच घ्यावा, अशी धारणा होती. १५ लाख रुपये घेऊन निवडणुकीत उतरलो. इतर खर्चासाठी जनतेला आवाहन केले आणि त्यांनी निवडणूक हातात घेतली. तेथेच माझा विजय निश्चित झाला. एरव्ही स्थानिक संस्थेपासून विधानसभेपर्यंत एकमेकांच्या विरोधात राहणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते एकत्र आले. मात्र जनता माझ्या पाठीशी एकवटली. जनशक्ती काय करु शकते, हे त्यांनी दाखवून दिले. यापुढे राष्ट्रवादीचे तण उपटून काढण्याचा कार्यक्रम आहे. यावेळी बाबासाहेब सूर्यवंशी, प्रसाद पाटील, अभिजित पाटील, पृथ्वीराज पवार, बी. जी. पाटील, विलास रकटे, सयाजी मोरे, महेश पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)