जनता गाडीसाठी ‘जनते’चा एल्गार

By Admin | Updated: December 15, 2014 23:57 IST2014-12-15T23:32:43+5:302014-12-15T23:57:05+5:30

विद्यार्थ्यांनी रोखल्या बसेस : शहरांतर्गत टप्पे वाहतूक बंदचा निर्णय मागे घेण्याची मागणी; पोलिसांच्या आश्वासनांनतर आंदोलन मागे

Janata's Elgar for the public car | जनता गाडीसाठी ‘जनते’चा एल्गार

जनता गाडीसाठी ‘जनते’चा एल्गार

प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी एस.टी. महामंडळाला जनता गाडीद्वारे सुरू असलेली शहरांतर्गत टप्पा वाहतूक बंद करण्याची सूचना केल्यानंतर आज, सोमवारी सकाळी ११ वाजता कागल-रंकाळा व हुपरी-रंकाळा एस. टी. बसमध्ये शहरातील प्रवाशांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी दसरा चौक येथे कागल-रंकाळा जनता गाडी रोखून धरली. यावेळी लक्ष्मीपुरी ठाण्याच्या पोलिसांनी व विद्यार्थी कल्याण मंडळाचे अध्यक्ष पंकज मोरे यांनी समजूत काढत विद्यार्थांना बाजूला केले व हा मार्ग खुला केला.



कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जनता गाडीची शहरातील टप्पा वाहतूक बंद करण्याच्या सूचना केल्यानंतर गेल्या दोन दिवसापासून प्रवाशात अंसतोषाचे वातावरण होते. गेली अनेक वर्षे सोयीची व आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या जनता गाडीत शहरात प्रवेश मिळणार नाही म्हटल्यावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.
आज, सोमवारी या सूचनांची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर कॉलेज विद्यार्थी आक्रमक झाले. सुमारे दोन तास थांबूनसुद्धा बसमध्ये घेत नाहीत व दुसरी कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने त्यांनी कागल-रंकाळा व हुपरी-रंकाळा या बसेस रोखून धरल्या. यावेळी, जोपर्यंत आम्हाला गाडीत घेत नाहीत, तोपर्यंत गाडी सोडणार नाही, अशी भूमिका घेत विद्यार्थी रस्त्यावरच ठाण मांडून बसल्याने या मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या.
ही घटना लक्ष्मीपुरी पोलिसांना कळताच ते मोठा फौजफाटा घेऊन याठिकाणी दाखल झाले. तसेच शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे अध्यक्ष पंकज मोरे हे सुद्धा घटनास्थळी आले. जर एस. टी. महामंडळ कमी तिकिटामध्ये शहरांतर्गत प्रवासी घेऊन जाते, मग ‘केएमटी’ला का परवडत नाही? तिकीटदरात एवढी तफावत का? परिवहन खाते एस.टी.कडे परवाना मागते, मग शहरात अनेक अवैधरीत्या वाहतूक सुरू आहे, त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? अशा प्रश्नांचा भडिमार विद्यार्थ्यांनी पोलिसांवर केला. तुमच्या प्रश्नासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेतो, असे आश्वासन पंकज मोरे यांनी विद्यार्थ्यांना दिल्यानंतर विद्यार्थी शांत झाले व त्यांनी रस्ता मोकळा केला.



निर्णय बदला; अन्यथा आंदोलन तीव्र
विविध संघटनांची मागणी : विद्यार्थ्यांनी केले ‘गांधीगिरी’ने आंदोलन; शहरातील अवैध वाहतूक थांबविण्याची मागणी
कोल्हापूर : एस.टी. महामंडळास शहरांतर्गत टप्पे वाहतूक बंद करण्याची केलेली सूचना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी आज, सोमवारी पंचायत समिती सदस्या अरुणिमा माने, एनएसयुआय विद्यार्थी संघटना, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांच्याकडे केली.
पंचायत समिती सदस्या अरुणिमा माने म्हणाल्या, कागल-रंकाळा बसमधून दररोज उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव येथील अनेक शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार प्रवास करतात; परंतु ही बस बंद झाल्याने या मार्गावरील प्रवाशांना नेण्यासाठी अन्य वाहने रस्त्यांवर येतील. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीसह प्रदूषण वाढणार आहे. ही बससेवा बंद झाल्यास प्रवाशांना आर्थिक फटका बसणार आहे. यावेळी राजू माने, सुनंदा माने, सुरेखा माने, मालू बामणे, अवनि माने, बबन शिंदे, बाळू पुजारी, अतुल ढाले, अनिल कांबळे उपस्थित होते.
‘गांधीगिरी’ने आंदोलन
एनएसयुआय विद्यार्थी संघटना, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांना गुलाबपुष्प देऊन ‘गांधीगिरी’ मार्गाने आंदोलन केले. यावेळी, प्रादेशिक परिवहन पदाधिकारी शहरातील अवैध वाहतुकीकडे जाणूनबुजून कानाडोळा करीत आहेत, असा आरोप करीत परिवहन महामंडळाने घेतलेला जाचक निर्णय त्वरित मागे घ्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी संघटनांच्यावतीने देण्यात आला. यावेळी एनएसयुआय काँग्रेसचे उपाध्यक्ष भारत घोडके, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, शहराध्यक्ष अवधूत अपराध, नीलेश यादव, सचिन शिरगावे, सूरज सूर्यवंशी, सचिन मुदगल, रविराज व्यास, आदी उपस्थित होते.
...अन्यथा तीव्र आंदोलन
शहरांतर्गत असणाऱ्या अवैध वाहतुकीवर कारवाई न करता विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार बंद करावा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे अध्यक्ष पंकज मोरे यांनी आज दिले. याप्रसंगी बाळू माळी, अवधूत गायकवाड, संदीप गडकर, प्रमोद पिंगळे, विवेक कोकरे, लजिना तुरुक यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

कोल्हापुरातील दसरा चौक येथे सोमवारी कागल-रंकाळा व हुपरी-रंकाळा एस.टी. बसमधून शहरांतर्गत प्रवास करण्यास मज्जाव केल्याने विद्यार्थ्यांनी सकाळी अकरा वाजता कागल-रंकाळा एस.टी. बस रोखून धरली. दुसऱ्या छायाचित्रात आंदोलन मागे घेण्यासाठी विद्यार्थ्यांची समजूत काढताना पोलीस कर्मचारी व शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे अध्यक्ष पंकज मोरे.


एस.टी. महामंडळाकडे शहरांतर्गत टप्पा वाहतूक करण्याचा परवाना नसल्यामुळे शहरांतर्गत टप्पा वाहतुकीवर बंदी आहे. या मार्गावरील गाडी बंद केलेली नाही. प्रवाशास शहराच्या हद्दीबाहेर या गाडीतून जाता-येता येते. त्यामुळे एस.टी.ने शहराच्या बाहेर जाण्यासाठी कोणत्याही बसथांब्यावरून प्रवाशांना गाडीत घेतले पाहिजे, तसेच शहराच्या बाहेरून येताना कोणत्याही बसथांब्यावर सोडले पाहिजे.
-लक्ष्मण दराडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी




कोल्हापुरातील एस.टी. बसेसची शहरांतर्गत टप्पा वाहतूक बंद करू नये, या मागणीचे निवदेन सोमवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांना देताना पंचायत समिती सदस्या अरुणिमा माने, राजू माने, सुनंदा माने, आदी.

रिक्षास ६० रुपये
आज सकाळी टेंबलाईवाडी येथे एका वृद्धाला हुपरी-रंकाळा गाडीत प्रवेश नाकारल्यांनतर त्यांनी रिक्षाला सीपीआरकडे जाण्यासाठी किती घेणार? अशी विचारणा केली. रिक्षाचालकाने ६० रुपये सांगितले. यावेळी ती वयस्कर व्यक्ती, ‘बाबा, मी या ठिकाणी एस.टी.ने फक्त पाच रुपयांत जातो. मग तुला ६० रुपये कुठले देऊ’ असे म्हणत तेथेच थांबली.

Web Title: Janata's Elgar for the public car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.