पन्हाळ्यात ‘जनसुराज्य’ची होणार दमछाक
By Admin | Updated: September 5, 2016 00:38 IST2016-09-05T00:38:02+5:302016-09-05T00:38:02+5:30
शिवसेनेची तयारी सरस : गटाचे अस्तित्व राखण्यात नेतेमंडळींना रस; विनय कोरे यांच्यासमोर बालेकिल्ला राखण्याचे आव्हान

पन्हाळ्यात ‘जनसुराज्य’ची होणार दमछाक
नितीन भगवान ल्ल पन्हाळा
जिल्हा परिषदेच्या सत्तेत महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या आणि पन्हाळा तालुक्यातील चर्चेच्या जनसुराज्य शक्ती पक्षाची शिवसेना, राष्ट्रवादी व काही ठिकाणी काँग्रेस पक्षाशी लढत देताना दमछाक होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाची तयारी पाहता, जनसुराज्य शक्ती पक्षाला बालेकिल्ला राखण्यात कितपत यश येते, हे काळच ठरविणार आहे.
पन्हाळा तालुका दोन विधानसभा मतदारसंघांत विभागला आहे. पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघात सातवे, कोडोली, पोर्ले तर्फ ठाणे हे तीन जिल्हा परिषद मतदारसंघ, तर पन्हाळा-करवीर मतदारसंघात कोतोली, यवलूज व कळे हे तीन जिल्हा परिषद मतदारसंघ येतात. त्या अंतर्गत १२ मतदारसंघ पंचायत समितीचे येतात. पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात २0१२ साली आमदार विनय कोरेंचे प्राबल्य असल्याने तीनही उमेदवार जनसुराज्य पक्षाचे निवडले गेले, तर पन्हाळा-करवीरमध्ये आमदार चंद्रदीप नरकेंचे प्राबल्य आहे, तरीसुद्धा यवलूजमध्ये जनसुराज्यने आपला उमेदवार या ठिकाणी निवडून आणला, तर कळे आणि कोतोलीत शिवसेनेने बाजी मारली; म्हणजे जनसुराज्य पक्षाचे चार व शिवसेनेचे दोन असे बलाबल २0१२ च्या निवडणुकीत झाले.
२0१२च्या जिल्हा परिषद मतदारसंघातील पोर्ले तर्फे ठाणे मतदारसंघात सर्वांत रंगतदार आणि आजअखेर चर्चेची लढत पाहावयास मिळाली होती. जनसुराज्य पक्षाचे प्रकाश पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाचे बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांचा पराभव अवघ्या २५0 मतांनी झाला.
कोतोली मतदारसंघात जनसुराज्य पक्षाची भिस्त माजी उपसभापती शंकर पाटील यांच्यावर होती. तथापि गोतावळ्याच्या राजकारणात त्यांना अपयश आले. कळे मतदारसंघ म्हणजे आमदार चंद्रदीप नरकेंचा बालेकिल्ला. या ठिकाणी शिवसेनेशिवाय अन्य कोण हे अपेक्षितच नव्हते. याला छेद देत जनसुराज्य पक्षाने यवलूज मतदारसंघ काबीज केला. खरं तर हा मतदारसंघ आमदार नरके यांचाच; पण चुकीची उमेदवारी आणि साखर कारखान्याचे राजकारण पराभवास कारणीभूत
ठरले.
पंचायत समितीच्या १२ जागांपैकी सहा जागा जनसुराज्य शक्ती पक्षाकडे, दोन जागा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे, तीन जागा शिवसेनेकडे, तर एक जागा राष्ट्रवादीकडे, अशा विचित्र पद्धतीचा पंचायत समितीचा कारभार सुरू झाला. पहिली अडीच वर्षे मागासवर्गीय सभापती असल्याने केवळ एक उमेदवार राष्ट्रवादीचा असून देखील संजय चावरेकर हे सभापती झाले. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र कारभार करत होते. हे पहिल्या अडीच वर्षाचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. यानंतर चिठ्ठी पद्धतीत सभापती आणि उपसभापती जनसुराज्य पक्षाचे झाले आहेत.
गेल्या निवडणुकीत जनसुराज्य पक्षाने जिल्हा परिषद मतदारसंघात सहा पैकी चार जागा जिंकल्या, तथापि कोडोली मतदारसंघातील भाग्यश्री भारत पाटील यांनी काडीमोड घेतल्याने त्यांचे यश निम्म्यावर आले. तीच परिस्थिती पंचायत समितीमध्ये राहिली. या ठिकाणी जनसुराज्य पक्षाचे सहा उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत जनसुराज्य पक्षाकडे आमदारपद होते, तरीसुद्धा ते काठावरच राहिले. आता तर ते पदही नाही, तरीसुद्धा येणाऱ्या निवडणुकीत जनसुराज्य विरुद्ध शिवसेना असाच सामना पाहावयास मिळणार आहे.
पन्हाळा तालुका
४गत निवडणुकीत पंचायत समितीवर कोडोलीतून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले होते. आता तिथे जनसुराज्यने आपला झेंडा रोवला आहे. ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे; पण त्यांच्या जवळचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भारत पाटील हे त्यांच्यापासून दूर गेल्याने तेथील राजकीय घडामोड काळच ठरविणार आहे.
शिवसेनेचे आमदार
दोन्ही मतदारसंघांत शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत. आमदार सत्यजित पाटील व आमदार चंद्रदीप नरके एकदिलाने काम करू लागले असले तरी या दोघांनी पक्षापेक्षा आपले गट निर्माण केले. यामुळे पाटील गट, नरके गट यात भर पडली. कोरे गट, माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचाही गट अजून अस्तित्वात आहे. यात राष्ट्रवादी पक्ष कुठेच कार्यरत नाही. या सर्वच घडामोडींत झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोरे गटाने म्हणजेच जनसुराज्य पक्षाने आपले अस्तित्व बऱ्यापैकी राखले आहे. परंतु, ग्रामपंचायतीसाठी आणावा लागणारा निधी मिळविताना होणारा मनस्ताप पाहता काही गावांनीच शिवसेनेचा हात धरल्याने यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाला शक्ती खर्ची घालावी लागणार आहे.