आता महाविद्यालयांत घुमणार ‘जन गन मन....
By Admin | Updated: July 20, 2014 00:09 IST2014-07-20T00:01:56+5:302014-07-20T00:09:40+5:30
उच्च शिक्षणचे सर्व विद्यापीठांना पत्र : प्राचार्य व विद्यार्थी संघटनांमधून निर्णयाचे स्वागत

आता महाविद्यालयांत घुमणार ‘जन गन मन....
कोल्हापूर : ‘जन गण मन...’ हे राष्ट्रगीत आता सर्व महाविद्यालयांत घुमणार आहे. महाविद्यालयांत राष्ट्रगीत सुरू करण्याबाबतचे पत्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलसचिव आणि शिक्षण संचालकांना पाठविले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच होणार असून, या निर्णयाचे सर्व स्तरावर स्वागत करण्यात येत असून, राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्ती वाढण्यास यामुळे नक्कीच उपयुक्त ठरेल, असे मत विविध महाविद्यालयांतील प्राचार्य व विद्यार्थी संघटनांमधून व्यक्त होत आहे.
राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी प्रार्थनेसोबत राष्ट्रगीत म्हटले जाते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम व देशभक्तीची भावना निर्माण होते. हीच भावना तरुण पिढीमध्ये जागृत करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राष्ट्रगीत म्हणण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे.
शासनाच्या या निर्णयाचे स्वागत आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम वाढण्यासाठी मदत होणार आहे. तसेच महाविद्यालय सुरू होताना पहिल्यांदा राष्ट्रगीत होणार आहे. त्यानंतर महाविद्यालय सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना वेळेत येण्याची सवय लागणार आहे. यातून देशप्रेम, बंधुप्रेम आणि सामाजिक कार्य करण्यासाठी त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल.
- प्राचार्य एस. बी. कणसे,
महावीर महाविद्यालय
पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळांमध्ये प्रार्थनेसोबत राष्ट्रगीत घेतले जाते. आता महाविद्यालयांतही राष्ट्रगीत म्हटले जाणार आहे. त्यामुळे शाळांतील जुन्या आठवणींना उजाळा तर मिळणार आहे. पण त्यासोबतच देशाबद्दल युवक-युवतीमध्ये आणखी देशप्रेम वाढणार आहे.
- भारत घोडके, अध्यक्ष, एनएसयुआय
राष्ट्रगीत सक्तीबाबत विद्यापीठास शासनाचे परिपत्रक मिळाले आहे. याबाबत शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाच्यावतीने विद्यापीठाशी संलग्नित २८० महाविद्यालयांना परिपत्रक काढण्यात आले आहे. महाविद्यालयांनी कार्यवाहीबाबतचा अहवाल विद्यापीठाला पाठवावा लागणार आहे. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेपुढे या बाबात विषय ठेवण्यात आला आहे. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेमध्ये याबाबत चर्चा होवू यांची अमंलबजावाणी करण्यात येणार आहे.
- डॉ. डी. के. गायकवाड,
संचालक, विद्यार्थी कल्याण मंडळ
शासनाने प्रत्येक महाविद्यालयांत राष्ट्रगीत म्हणणे सक्तीचे केले आहे. ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. विद्यार्थ्यांची दररोज महाविद्यालयातील सुरुवात एका चांगल्या विचाराने होणार आहे. यामुळे त्यांच्यामध्ये देशप्रेम तर निर्माण होईलच, पण त्यासोबत त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये नक्कीच वाढ
होणार आहे.
- प्राचार्य डॉ. के. एस. नलवडे,
राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज
शासनाचा हा निर्णय चांगला आहे. देशभक्ती कमी होत चालेली होती,या निर्णयामुळे देशभक्ती वाढण्यासाठी आणि युवकांच्या मध्ये एकता वाढण्यास उपयुक्त ठरणार आहे. या निर्णयांचे आम्ही स्वागत करतो.
- चेतन शिंदे, जिल्हाप्रमुख,
भारतीय विद्यार्थी सेना