कोल्हापूर : राजकारणात मतभेद विसरुन एकत्र येऊन चांगले काम करणे कधीही चांगलेच. त्यामुळे सगळे मतभेद विसरुन आम्ही एकत्र येत असू तर ते चांगलेच आहे, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी कोल्हापुरात दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर भाष्य केले. सगळे मतभेद विसरून चांगले काम केले तर वाईट वाटायचे कारण नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.दोन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का ? या प्रश्नावर पवार यांनी एकत्र येणे चांगलेच असल्याचे सांगितले. पवार म्हणाले, मनसे व उद्धवसेना एकत्र आले तर चांगलेच आहे. दोन भाऊ मतभेद विसरुन एकत्र येणे चांगलेच असते. पण, ते एकत्र येतील की नाही हे सांगायला मी ज्योतिषी नाही. जनसुरक्षा कायद्यामुळे सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. या कायद्यात दुरुस्ती करण्याच्या विचार सुरु असून याला आमचा पाठिंबा असल्याचेही पवार म्हणाले.राज यांची भाषा बरोबर नाहीपहिली ते चौथीपर्यंत हिंदी भाषा लादणे योग्य नाही, पण भारतात ५० टक्के नागरिक हिंदीत बोलतात. त्यामुळे हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नसल्याचे पवार म्हणाले. हिंदीला विरोध करण्यासाठी निघणाऱ्या मोर्चात कोण कोण येत नाही हे पाहतोच ही राज ठाकरे यांची भाषा बरोबर नाही. तुम्ही सहभागी व्हा म्हटल्यावर सहभागी होता येत नाही. भूमिका समजावून घ्यावी लागेल. महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय असेल तर भूमिका घेतली जाईल, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले.
मतभेद विसरुन एकत्र येणे कधीही चांगलेच, शरद पवार यांचे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 11:33 IST