‘आविष्कार’मध्ये संशोधनातील नवकल्पना
By Admin | Updated: December 23, 2015 01:24 IST2015-12-23T00:49:34+5:302015-12-23T01:24:13+5:30
शिवाजी विद्यापीठात महोत्सव : कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांतील विद्यार्थी

‘आविष्कार’मध्ये संशोधनातील नवकल्पना
कोल्हापूर : एज्युकेशन एफएम ट्रान्समीटर, सांडपाण्यातून वीजनिर्मिती, अंड्याच्या कवचापासून पाण्याच्या शुद्धीकरणाबाबतच्या विविधांगी संशोधनाचे दर्शन मंगळवारी शिवाजी विद्यापीठात घडले. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील असणाऱ्या विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी संशोधनविषयक आविष्कार महोत्सवात नवकल्पना मांडल्या.
विद्यापीठ पातळीवरील मध्यवर्ती आविष्कार संशोधन महोत्सवाचे उद्घाटन सकाळी अकरा वाजता लोककला केंद्रात ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. डी. आर. मोरे यांच्या हस्ते झाले. दरम्यान, महोत्सवातील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांची पुणे येथे १०, ११ आणि १२ जानेवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय आविष्कार संशोधन महोत्सवासाठी निवड झाली आहे.
यावेळी प्रभारी कुलसचिव
डॉ. व्ही. एन. शिंदे म्हणाले, संशोधक विद्यार्थी, शिक्षकांनी सर्वसामान्यांना उपयुक्त ठरेल, असे संशोधन करण्यावर भर द्यावा. संशोधनासाठी आवश्यक असणारी चौकसबुद्धी जोपासावी. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांतून संशोधनावर आधारित प्रकल्प हाती घ्यावेत.
महोत्सवात राजाराम कॉलेजच्या अमित महाजन या विद्यार्थ्याने सांडपाण्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प सादर केला. यातून त्याने गॅससह खते आणि शुद्ध पाणी मिळण्याची संकल्पना मांडली. साताऱ्याच्या एलबीएस कॉलेजच्या ऐश्वर्या कदम व कोमल वाघ यांनी ‘कॉम्पॅक्ट हाय रेंज एज्युकेशन एफएम ट्रान्समीटर’ सादर केले. दोनशे मीटर अंतरापर्यंत एफएफची फ्रिक्वेन्सी असलेल्या चॅनेलवरून मनोरंजनासह शैक्षणिक बातम्या ऐकता येऊ शकतात. घरगुती पाणी वापराचे नियोजन करण्यास उपयुक्त ठरणारे अल्ट्रासॉनिक डिस्टंट मीटरचे मॉडेल विवेकानंद महाविद्यालयाच्या सूरज बाऊचकरने मांडले. पेठवडगावमधील विजयसिंह यादव कला, विज्ञान कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अंड्याच्या कवचापासून पाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प सादर केला. यशवंतराव चव्हाण कॉलेजच्या मीनल कळके या विद्यार्थिनीने डिजिटल अॅग्रीकल्चरचे मॉडेल सादर केले. पलूस औद्योगिक वसाहतीतील उद्योगातील स्क्रॅप व्यवस्थापनातून नवीन वस्तूनिर्मिर्ती उद्योग : एक अभ्यास, मनोशास्त्रीय आजारासाठी पदवीच्या अंतिम वर्षातील कला आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवा : तुलनात्मक अभ्यास, सही करण्याचे नियम विद्यार्थ्यांनी भित्तिपत्रकातून मांडले होते. महोत्सवातील संशोधन प्रकल्प, भित्तिपत्रके पाहण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गर्दी केली होती. दरम्यान, महोत्सवातील विजेत्यांना प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रा. एम. एल. जाधव, डॉ. पी. ए. अत्तार, ए. एम. गुरव, आदी उपस्थित होते.
महोत्सवातील विजेते असे
या महोत्सवात मानव्यशास्त्र, भाषा, कला, शिक्षण गटात रेश्मा जाधव (आर्टस् अॅण्ड कॉमर्स कॉलेज, नागठाणे), श्वेता नाझरे (आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स् कॉलेज, पलूस), नीशा भालवणे (यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर). वाणिज्य, व्यवस्थापन, विधी या गटात ऋतुजा पवार (सावित्रीबाई महिला महाविद्यालय, सातारा), भक्ती पारपळकर (आजरा महाविद्यालय), तेजस्विनी सूर्यवंशी (आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स् कॉलेज, पलूस). शुद्धशास्त्र गटात ऋतुजा साबणे (केडब्ल्यूसी कॉलेज, सांगली), आरमन पटेल (एलबीसी कॉलेज, सातारा), अनिकेत सुतार (विजयसिंह यादव आर्टस् अॅण्ड सायन्स् कॉलेज, पेठवडगाव). कृषी गटात सायली शेळके (सायबर), शीतल चव्हाण (विजयसिंह यादव आर्टस् अॅण्ड सायन्स् कॉलेज, पेठवडगाव), शंतनू जाधव (आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स् कॉलेज, पलूस). अभियांत्रिकी व तंत्रज्ञान गटात सूरज बाऊचकर (विवेकानंद कॉलेज), राजदीप पाटील (आरआयटी, इस्लामपूर), मुग्धा सावंत (सायबर). औषध निर्माणशास्त्र गटात रूपिका पवार (केडब्ल्यूसी कॉलेज, सांगली), भाग्यश्री काकडे (यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स्, सातारा), शबनम मुल्ला (टीकेसीपी, वारणानगर).