जिल्ह्याचे उद्योगचक्र पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:26 IST2021-05-25T04:26:53+5:302021-05-25T04:26:53+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील कडक लॉकडाऊनमुळे गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेले उद्योगचक्र सोमवारपासून पूर्ववत सुरू झाले. पहिल्या दिवशी ...

जिल्ह्याचे उद्योगचक्र पुन्हा सुरू
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील कडक लॉकडाऊनमुळे गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेले उद्योगचक्र सोमवारपासून पूर्ववत सुरू झाले. पहिल्या दिवशी कामगारांची उपस्थिती कमी राहिली. औद्योगिक वसाहतींमधील उद्योग, कारखान्यातील कामाची गती आज, मंगळवारपासून वाढणार असल्याचे उद्योजकांनी सांगितले.
कोरोनाच्या प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्योजक हे आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनमध्ये सहभागी झाले. या लॉकडाऊनपूर्वीच्या राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील शिवाजी उद्यमनगर, शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांनी त्यांचे कारखाने, फौंड्री, मशीन शॉप्स सोमवारपासून पूर्ववत सुरू केले. सकाळी सात वाजल्यापासून काही कारखान्यातील यंत्राची धडधड सुरू झाली. काही कारखान्यामध्ये यंत्राची साफसफाई आणि त्यांच्या दुरूस्तीचे काम दुपारपर्यंत करण्यात आली. कडक लॉकडाऊन संपल्यानंतरच पहिला दिवस असल्याने औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांची उपस्थिती कमी होती. थर्मल स्कॅॅनरने तपासणी करून कामगारांना कारखान्यामध्ये प्रवेश देण्यात आला. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत त्यांच्याकडून काम करण्यात आले. सकाळी आठ ते दुपारी चार आणि दुपारी चार ते रात्री बारा अशा शिफ्टमध्ये अधिकत्तर उद्योगांमध्ये काम चालले.
चौकट
काम संपल्यानंतर थेट घरी जावे
औद्योगिक वसाहतींमधील बहुतांश उद्योगांना सोमवारी साप्ताहिक सुटी असते. त्यामुळे कडक लॉकडाऊन संपल्यानंतरच्या पहिल्या दिवशी कामगारांची उपस्थिती कमी राहिली. उद्यापासून त्यांच्या उपस्थितीची संख्या वाढल्यानंतर कामाची गती वाढणार असल्याचे ‘गोशिमा’चे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस यांनी सांगितले. कामगारांना एमआयडीसीमध्ये येण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी आम्ही गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यातील पोलिसांकडे केली. त्याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शविली. कामगारांनी कंपनीतील काम संपल्यानंतर रस्त्यावर विनाकारण थांबू नये. त्यांनी थेट घरी जावे, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. ही सूचना उद्योजक, कामगारांपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे पोतनीस यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
सोमवारपासून असल्याने शिरोली एमआयडीसीतील ४० ते ४५ टक्के उद्योग सुरू झाले. उद्यापासून त्यांची संख्या वाढेल.
-अतुल पाटील, अध्यक्ष, स्मॅक.
कडक लॉकडाऊन संपल्यानंतरच्या पहिल्या दिवशी कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कारखाने सुरू झाले आहेत.
-गोरख माळी, अध्यक्ष, मॅॅक.