जिल्ह्यातील औद्योगिक विस्तार थांबणार

By Admin | Updated: September 7, 2015 22:27 IST2015-09-07T22:27:59+5:302015-09-07T22:27:59+5:30

डोणोलीसाठी महामंडळाचे प्रयत्न : टोप, करवीर आणि अर्जुनी औद्योगिक वसाहती विरोधामुळे मागे पडल्या

Industrial expansion will be stopped in the district | जिल्ह्यातील औद्योगिक विस्तार थांबणार

जिल्ह्यातील औद्योगिक विस्तार थांबणार

सतीश पाटील -- शिरोली -जिल्ह्यातील टोप, करवीर आणि अर्जुनी या तिन्ही ठिकाणच्या नव्याने होऊ घातलेल्या औद्योगिक वसाहत स्थानिक पातळीवरील विरोधामुळे मागे पडल्या असून, जिल्ह्यात सध्या तरी कोणतेही नवीन उद्योग येणार नाहीत तसेच उद्योगांचा कोणताही विस्तार होणार नाही.कोल्हापूर जिल्ह्यात उद्योग विस्तारला पाहिजे, नवीन उद्योग यावेत, स्थानिक उद्योजकांना उद्योग विस्तारासाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत २००५ साली पुणे-बंगलोर महामार्गालगत टोप येथे एक हजार हेक्टर क्षेत्रात औद्योगिक वसाहत उभारण्याचे महामंडळाचे नियोजन होते. त्यासाठी टोप, संभापूर, वडगाव या भागातील जागेची पाहणी करण्यात आली. त्यावर महामंडळाचे शिक्कामोर्तबही झाले. शिरोली, गोकुळ शिरगाव आणि कागल पंचतारांकित नंतर टोप याठिकाणी एक हजार हेक्टर क्षेत्रात मोठी औद्योगिक वसाहत होणार असे वाटत होते, पण स्थानिक जनता, शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे टोप येथील अंतिम टप्प्यातील औद्योगिक वसाहतीचा निर्णय शासनाने मागे घेतला. त्यानंतर करवीर तालुक्यातील नेर्ली, तामगाव, विकासवाडी, कणेरी, कणेरीवाडी, हलसवडे याठिकाणी तीनशे हेक्टरमध्ये करवीर औद्योगिक विकास या नावाने औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात येणार होती.
यासाठी महामंडळ, स्थानिक लोकप्रतिनिधी, शेतकरी यांच्यात बऱ्याच बैठका झाल्या, पण अजून याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवर असलेल्या अर्जुनी याठिकाणीही औद्योगिक विस्तार करण्यासाठी साडेतीनशे हेक्टर जमीन औद्योगिक विकास महामंडळाने घेण्यासाठी प्रयत्न केले.
यावेळी या भागात नवीन उद्योग येतील, स्थानिकांना व्यवसाय मिळेल, नोकऱ्या मिळतील यासाठी या भागातील राजकीय लोकांनीही सुरुवातीला पाठिंबा दिला होता. या ठिकाणी साडेतीनशे हेक्टरमध्ये औद्योगिक वसाहत होईल असे वाटत होते, पण यालाही विरोध झाला आहे. कोल्हापुरात उद्योग विस्तार वाढवण्यासाठी आणि नवीन मोठे उद्योग सुरू करण्यासाठी अनेक कंपन्या इच्छुक होत्या, पण कुठेही जागा उपलब्ध नाही. त्यामुळे सध्यातरी उद्योग विस्तार होणे अवघड आहे.
शाहूवाडी, डोणोली येथे नवीन औद्योगिक वसाहत होण्यासाठी महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. या परिसराची पाहणीही केली आहे, पण अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. या ठिकाणीही विरोध झाला तर जिल्ह्यात औद्योगिक विस्तार होणे अवघड आहे, असे औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी एस. एस. वराळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.


जिल्ह्याचा गेल्या दहा वर्षांत औद्योगिक विस्तार झालेला नाही. टोप, करवीर आणि अर्जुनी या नव्याने होऊ घातलेल्या एमआयडीसींचा प्रस्ताव स्थानिक विरोधामुळे मागे पडला आहे. उद्योग विस्तारासाठी मागणी आहे, पण जमिनी उपलब्ध नाहीत. त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यात कोणतेही उद्योग येणार नाहीत आणि विस्तारही होणार नाही
- एस. एस. वराळे, औद्योगिक महामंडळाचे कायर्कारी अधिकारी

उद्योग वाढवण्यासाठी आज जागेची गरज आहे, जागाच उपलब्ध नसेल तर बाहेरचे उद्योग येणार कसे, मोठे उद्योग परराज्यात चालले आहेत, उद्योग विस्तार झाला नाही तर शहराची प्रगती होणार नाही, उत्पादन वाढणार नाही, त्यामुळे नवीन एमआयडीसी होणे गरजेचे आहे, त्याचा सर्वांनाच फायदा होईल आणि शहराचीही प्रगती होईल.
- उदय दुधाणे, माजी अध्यक्ष, गोशिमा

टोप, मंगरायाचीवाडी याठिकाणी एमआयडीसीसाठी जागा आरक्षित करण्यात आली होती, पण ही सर्व जमीन पिकाऊ आहे. या जमिनींना वडगाव नगरपालिकेचे पाणी आहे. पिकाऊ जमिनी काढून घेतल्यावर आम्ही काय खाणार. आमच्या दोन्ही गावांतील शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी जाणार होत्या म्हणून आम्ही विरोध केला .
- सुहास जाधव, शेतकरी, पेठवडगाव

कोल्हापूर शहराचा विकास होण्यासाठी मुंबई-बंगलोर कॉरिडॉर होणे गरजेचे आहे. या ठिकाणी उद्योग आले पाहिजेत. नवीन एमआयडीसी होणे आवश्यक आहे, यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. नवीन एमआयडीसी झाली, तर मोठे उद्योग येतील, रोजगार उपलब्ध होईल. येथील कारखान्यांना काम मिळेल, आर्थिक उलाढाल वाढेल. शहराची ग्रोथ होईल, कामगारवर्ग वाढेल, नक्कीच सर्वांना फायदा होईल.
- सुरेंद्र जैन, अध्यक्ष, स्मॅक

Web Title: Industrial expansion will be stopped in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.