उत्तूरमध्ये बहुरंगी लढत रंगण्याचे संकेत
By Admin | Updated: December 30, 2016 00:11 IST2016-12-30T00:11:04+5:302016-12-30T00:11:04+5:30
राजकीयदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघ : काँग्रेस, राष्ट्रवादी व महाआघाडीत सामना; विजयाची कोणालाच खात्री नाही

उत्तूरमध्ये बहुरंगी लढत रंगण्याचे संकेत
रवींद्र येसादे --उत्तूर --राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणारा उत्तूर मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला असल्याने तिरंगी अथवा चौरंगी लढतीचे चित्र निर्माण होत असून, विजयाची खात्री निश्चितपणे कोणालाही देता येत नाही. काँग्रेसची ही जागा
हिसकावून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व्यूहरचना आखत असून, गतवेळी आजरा विकास आघाडीतून काँग्रेसच्या तिकिटावर उमेश आपटे हे निवडून आले होते. ते महाआघाडीत नसल्याने महाआघाडी स्वतंत्र उमेदवार उभा करणार आहे. येथे अपक्षांसह बहुरंगी लढत होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी स्थापन करण्यात आली. कारखान्यात यश मिळाल्याने महाआघाडीने निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. कारखाना निवडणुकीत उत्तूर-मडिलगे गटातून काँग्रेस व राष्ट्रवादीत युती झाल्यामुळे उमेश आपटे यांना उमेदवारी देण्यात आली. आपटे व वसंतराव धुरे विजयी झाले. राष्ट्रवादीतून उमेदवारी न दिल्याने मारुती घोरपडे यांनी बंडखोरी करीत महाआघाडीत प्रवेश केला व ते विजयी झाले. महाआघाडीने अंतर्गत मोर्चेबांधणी सुरू केली असून, महाआघाडी ठरवेल त्या उमेदवाराच्या पाठीशी राहावे, असे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात येत आहे. राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी न करण्याचा निर्धार आघाडीने घेतलेल्या मेळाव्यात केला आहे. मात्र, महाआघाडीत उमेदवारी निवड करताना कसरत करावी लागणार आहे.
आमदार हसन मुश्रीफ यांनी मतदारसंघात केलेली विकासकामे जनतेसमोर मांडली जाणार आहेत. पाच वर्षांत जि. प. सदस्य उमेश आपटे यांनी केलेली कामे जनतेला सांंगून ते निवडणुकीस सामोरे जात आहेत. जि.प. मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची पकड मजबूत असतानाही राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीचा फटका बसत आहे.
मागील निवडणुकीत धुरे यांच्याविरोधात सारे एकत्र आले होते. आमदारकीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील मंडळी एक होतात व इतर निवडणुकीत का एक होत
नाहीत, हा प्रश्नच विचारला जात आहे. आपटे हे गेली १५ वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करतात.
मागील राजकारणाच्या जोरावर मोर्चेबांधणी व वैयक्तिक गाठीभेटी सुरू केल्या आहेत. महाआघाडीचे नेते एकीकडे तर सामान्य माणूस आपटे यांच्यासोबत असल्याचे बोलले जात आहे.
आमदार सतेज पाटील यांनी उमेश आपटे यांना अध्यक्षपदाची संधी जिल्हा परिषदेत दिली. हा राग माजी आमदार महादेवराव महाडिक यांना आहे. महाआघाडीस महाडिक यांची साथ आहे. महाआघाडीचे नेतृत्व ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे यांच्याकडे आहे. यावेळी महाआघाडीस राष्ट्रवादी व काँग्रेस हे दोन शत्रू घेऊन आखणी करावी लागणार आहे.
आजी-माजी आमदारांचे विशेष लक्ष
उत्तूर येथील उमेदवारी ठरविण्यापासून निवडून आणेपर्यंत आजी व माजी आमदारांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. राष्ट्रवादीकडून आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसकडून आमदार सतेज पाटील, भाजपकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हाळवणकर, शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख विजय देवणे, माजी आमदार संजय घाटगे, महाआघाडीकडून माजी आमदार महादेवराव महाडिक यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.
भाजपनेही स्वबळाची भाषा केली आहे. तशी उमेदवारांनी मागणीही पक्षाकडे केली आहे. किती दिवस आघाडीला पाठिंबा द्यायचा, पक्षाचा विस्तार कसा होणार, ही भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. वरिष्ठांच्या आदेशानुसार शिवसेना स्वबळासाठी सज्ज आहे, तसे उमेदवारही निश्चित केले आहेत. विश्वनाथ करंबळी यांनी उमेदवारी एकमताने ठरविली तर आपण निवडणूक लढवू; अन्यथा महाआघाडीस पाठिंबा देऊ, असे स्पष्ट केले आहे.
मतदारसंघ खुला असल्याने महाआघाडीतील घटक पक्ष भाजप, शिवसेना, जनता दल व इतरही उमेदवारांसाठी आग्रह धरीत आहेत. त्यामुळे आघाडीत इच्छुकांची संख्या वाढण्याचे संकेत मिळत आहेत.
मतदारसंघातील गावे
उत्तूर, चव्हाणवाडी, करपेवाडी, मुमेवाडी, बहिरेवाडी, पेंढारवाडी, आर्दाळ, जाधेवाडी, मासेवाडी, खोराटवाडी, भादवण, भादवणवाडी, मडिलगे, सोहाळे, वडकशिवाले, महागोंड, वझरे, चिमणे, करपेवाडी, व्होन्याळी, झुलपेवाडी, धामणे, बेलेवाडी.
उमेदवाराचा शोध
भादवण गटातून मागास महिला गटाचे आरक्षण पडल्यामुळे इच्छुकांची संख्या फारच कमी आहे. शिवसेनेला व महाआघाडीस उमेदवार मिळाला आहे. भादवण अथवा मडिलगेसही जागा देण्यात येणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने सावध भूमिका घेत उमेदवारी जाहीर केलेली नाही. उमेदवाराचा शोध सुरू आहे. भादवण, मडिलगे वगळता अन्य गावांच्या उमेदवारांचा विचार होऊ शकतो.