योग, गुरुपरंपरा, मातृशक्तीमुळेच भारतीय संस्कृती जिवंत
By Admin | Updated: January 23, 2015 00:36 IST2015-01-23T00:18:16+5:302015-01-23T00:36:37+5:30
विजय भटकर : भारतीय संस्कृती महोत्सवात चौथ्या दिवशीही मोठी गर्दी;

योग, गुरुपरंपरा, मातृशक्तीमुळेच भारतीय संस्कृती जिवंत
कोल्हापूर : योग, गुरुपरंपरा आणि मातृशक्तीमुळेच भारतीय संस्कृती जिवंत आहे. संस्कृती आपल्याला प्रेरणा देण्यास शिकविते. ही संस्कृती आणि युवापिढीच्या ताकदीवर आपला देश विश्वगुरू बनणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी आज, गुरुवारी येथे केले. विविधतेने नटलेली भारतीय संस्कृती पाहण्यासाठी कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठावर सलग चौथ्या दिवशी भाविक, नागरिकांची गर्दी कायम राहिली.
भारतीय संस्कृती उत्सवातील युवाज्ञानोत्सवात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी योगगुरू रामदेवबाबा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची नात राजश्री चौधरी, नोबेल पुरस्कार विजेते डॉ. महादेव तलवार, गोव्याचे विधानसभा अध्यक्ष राजेंद्र आर्लेकर, ‘बॉर्डरलेस’चे अधिक कदम, आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ गुरुराज करजगी, ओडिसातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पुरोहित प्रमुख उपस्थित होते.
रामदेवबाबा म्हणाले, डॉक्टरकी तसेच अन्य स्वरूपांतील पदव्या सहजासहजी मिळत आहेत. अशी पदवी मिळत असली तरी त्यामुळे शिक्षण आणि संस्कृती कमी होत आहे. देशाला बलवान बनविण्यासाठी संस्कारपूर्ण शिक्षणाची गरज आहे. ‘कोणतीही गोष्ट एकदा करून बघितलीच पाहिजे’ हा आजच्या युवापिढीला ‘व्हायरस’ लागला आहे. (प्रतिनिधी)
कोण काय म्हणाले...
संस्कारक्षम शिक्षणाची गरज : रामदेवबाबा
राजश्री चौधरी : युवकांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यासह सुदृढ भारत घडविण्यासाठी नेताजी बोस यांनी निश्चित केलेल्या धोरणांची फाईल सरकारकडे अडकून आहे. ती खुली करण्यात यावी. स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करणारी ‘कॉमनवेल्थ’ स्पर्धा बंद व्हावी.
गुरुराज करजगी : जे बोलतो तेच करण्याची पद्धती शिक्षणात यावी. पुस्तकी ज्ञानाऐवजी मूल्याधिष्ठित शिक्षण देणे उपयुक्त ठरणारे आहे.
प्रदीप पुरोहित : राष्ट्रउभारणी हे विद्यार्थ्यांचे लक्ष्य असावे. जनतेचा सरकारवरील विश्वास उडाला आहे. सरकार न्याय देत नसल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. अशा स्थितीत युवकांनी संघटितपणे राष्ट्र उभारणी, समाजप्रबोधनाचे काम करावे.
डॉ. तलवार : राष्ट्र उभारणीत युवकांनी ‘डीआरडीओ’च्या माध्यमातून पुढाकार घ्यावा.
अधिक कदम : देशाच्या ‘बॉर्डर’ सुरक्षित नाहीत. तेथील जमिनी आपण मिळविल्या; पण लोक अजूनही आपल्यापासून दूर आहेत. त्यांना प्रेमाने आपलेसे केले पाहिजे. देशातील युवक काम करायला तयार आहेत; पण त्यांना साथ मिळत नसल्याचे वास्तव आहे.