प्रारूप मतदार यादींवरील तक्रारींचा वाढता ओघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:44 IST2021-02-21T04:44:33+5:302021-02-21T04:44:33+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रशासनाने तयार केलेल्या ८१ प्रभागांच्या प्रारूप मतदार यादींवरील तक्रारींचा आलेख वाढतच चालला आहे. शनिवारी ...

प्रारूप मतदार यादींवरील तक्रारींचा वाढता ओघ
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रशासनाने तयार केलेल्या ८१ प्रभागांच्या प्रारूप मतदार यादींवरील तक्रारींचा आलेख वाढतच चालला आहे. शनिवारी १३५ हरकती दाखल झाल्या. त्यामुळे एकूण हरकतींची संख्या ३१२ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ निर्माण झाला असून, या घोळाची व्याप्ती आता मोठी होत असल्याचे दिसून येत आहे.
महानगरपालिकेच्या चार विभागीय कार्यालयातील चार उपशहर अभियंता यांच्यावर प्रारूप मतदार याद्यांचे काम सोपविले होते. त्यांच्या हाताखाली सर्वेअर, बीएलओ तसेच अन्य काही कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. प्रारूप मतदार याद्या तयार करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आधी अंतिम प्रभागरचनेचा अभ्यास केला नाही, घाईगडबडीत काम उरकुन मोकळे झाल्याचे स्पष्ट होत आहे.
जवळपास पस्तीस ते चाळीस प्रभागांतील यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाले आहेत. प्रभागाच्या सीमा रेषेवरील मतदारांच्या गल्ल्याच्या गल्ल्या दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झालेल्या पाहायला मिळत आहेत. त्याशिवाय मृत व्यक्तींची नावे तशीच राहिली असून, अनेक प्रभागांत मतदारांची नावे दुबार झाली आहेत. दोन-तीन प्रभागात तर एकाच गल्लीतील, एकाच कॉलनीतील मतदारांची नावे दोन-दोन प्रभागात राहिली आहेत. त्यामुळे प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम अतिशय निष्काळजी आणि बेफिकिरीने झाल्याचे दिसून येत आहे.
महापालिका निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांना तसेच त्यांच्या समर्थकांना मतदार यादीतील घोळ प्रशासनाच्या निदर्शनास आणून देताना नाकीनऊ येऊ लागले आहे. भारतीय जनता पक्षाने तर या याद्याच रद्द करून नवीन कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. जेवढ्या तक्रारी वाढतील तेवढी प्रशासनाचीही डोकेदुखी होणार आहे. कारण दि. २३ फेब्रुवारीपासून दि. २ मार्चपर्यंत त्यांना याद्यातील त्रुटी दूर करून अंतिम यादी तयार करायची आहे आणि ती लगेच दुसऱ्यादिवशी म्हणजे दि. २ मार्च रोजी प्रसिध्द करायची आहे. याद्या दुरुस्तीसाठीचा कमी वेळ लक्षात घेता, कमीत कमी वेळेत जास्तीत-जास्त त्रुटी दूर करून याद्या निर्दोष करायचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
शनिवारी दाखल झालेल्या हरकती-
-गांधी मैदान कार्यालय - ३६
-शिवाजी मार्केट कार्यालय- ५६
-राजारामपुरी कार्यालय - ३२
- ताराराणी मार्केट कार्यालय - ११
- एकूण तक्रारींची संख्या - १३५
-शुक्रवारपर्यंत दाखल झालेल्या तक्रारी - १७७