भाजीपाल्याची आवक वाढली; दर मात्र स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST2021-05-31T04:18:29+5:302021-05-31T04:18:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात भाजीपाल्याची आवक वाढली असली तरी दर मात्र स्थिर आहेत. ढब्बू, गवार, दोडका ...

भाजीपाल्याची आवक वाढली; दर मात्र स्थिर
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात भाजीपाल्याची आवक वाढली असली तरी दर मात्र स्थिर आहेत. ढब्बू, गवार, दोडका या भाज्यांचे दर चढेच राहिले आहेत. टोमॅटोची आवक जास्त आहे. कडधान्य मार्केटमध्ये काहीसे थंडच आहे. फळ मार्केटमध्ये चिकू, सफरचंद, मोसंबी, हापूसची काहीसी रेलचेल पाहवयास मिळते.
मध्यंतरीचा आठ दिवसांचा लॉकडाऊन आणि त्यानंतर भाजीपाला विक्रीसाठी मिळत असलेला कमी कालावधीचा फटका भाजीपाला उठावाला बसला आहे. भाजीपाल्याची आवक वाढली आहे. कोबी, टोमॅटो, ढब्बू, भेंडीची आवक अधिक दिसत आहे. एकूणच भाज्यांची आवक वाढली असली तरी दर मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर दिसत आहे. कोथिंबीरीची आवक वाढली असून रोज ३३ हजार पेंढ्याची आवक बाजार समितीत होती. घाऊक बाजारात आठ रुपये पेंढी असली तरी किरकोळ बाजारात पंधरा रुपये दर आहे. उन्हाळी भुईमूगाची काढणी सुरू असल्याने ओल्या शेंगाची आवक सुरू आहे. साधारणता २६ रुपये किलो दर राहिला आहे. मेथीची आवक कमी झाल्याने दरात थोडी वाढ झाली आहे.
कडधान्य मार्केट एकदम थंडच आहे. पावसाळ्याची बेगमी म्हणून गेली दोन महिने नागरिकांनी कडधान्य खरेदी केल्याने आता मागणी थोडी कमी आहे. तरीही दरात फारसा चढउतार दिसत नाही. हरभरा डाळ ७५, तूरडाळ ११०, मूग १००, मटकी ४० रुपये किलो आहे. सरकी तेल १६० तर साखर ३५ रुपये किलो आहे.
अननसची आवक वाढली
अननसचा हंगाम सुरू झाला असून आवकही हळूहळू वाढू लागली आहे. बाजार समितीत रोज २५ ते ३० डझन अननसची आवक होते. घाऊक बाजारात १०० ते ३५० रुपये डझनचा दर राहिला आहे.
हापूसचा हंगाम अंतिम टप्यात
हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्यात आहे. आवक मंदावली असून सध्या ८७५ पेटी तर ३५५० बॉक्सची आवक होते. अद्याप मागणी चांगली असल्याने दर स्थिर आहेत.