कोयना धरणातील पाण्याच्या वापरात वाढ
By Admin | Updated: December 19, 2014 00:29 IST2014-12-18T22:11:25+5:302014-12-19T00:29:03+5:30
पातळी घटली : ८७.०१ टीएमसी पाणीसाठा

कोयना धरणातील पाण्याच्या वापरात वाढ
पाटण : वीजनिर्मिती आणि सांगलीकडील शेती व सिंचनासाठी पाण्याचा वापर वाढल्याने कोयना धरणातील पाणी कमी होऊ लागले आहे. धरणात केवळ ८७.०१ टीएमसीच पाणी शिल्लक आहे. १ जूनपासून आतापर्यंत ५३ टीएमसी पाण्यापासून १,५६२ दशलक्ष युनीट वीजनिर्मिती केली असून, पायथा वीजगृहातून वीजनिर्मितीकरून सांगलीकडे १६ टीएमसी पाणी सोडले आहे. कोयना धरणातील पाणी वापराचे तांत्रिक वर्ष १ जूनपासून सुरू होते. ते ३१ मे रोजी संपते. १०५ टीएमसी पाणीसाठ्यापैकी वीजनिर्मितीला ६७.५० टीएमसी पाणी वर्षभरात करारानुसार दिले जाते. मात्र, गेल्या वर्षापासून या कराराचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी वीजनिर्मितीसाठी ८७ टीएमसीपर्यंत पाण्याचा वापर झाला होता. यावर्षी १ जूनपासून १,५६२ दशलक्ष युनीट वीजनिर्मिती झाली. त्यासाठी आजपर्यंत ५३ टीएमसी पाणी वापरण्यात आले. मात्र, सप्टेंबरच्या मध्यंतरी धरण भरल्यानंतर पाणी दरवाजातून सोडण्यात आले. पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी दरवाजातून सोडण्यात आलेले पुराचे पाणी वगळता पायथा वीजगृहातून ३३ दशलक्ष युनीट वीजनिर्मिती टप्पा क्रमांक एक व दोनमधून ५८१, चौथा टप्पातून ६३४ आणि टप्पा क्रमांक तीनमधून ३१४ दशलक्ष युनीट वीजनिर्मिती करून पाणी कोयना नदीपात्रअत व चिपळूणकडे सोडण्यात आले. सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार १ जूनपासून आजअखेर सोळा टीएमसी पाणी पायथा वीजगृहात वीजनिर्मिती करून सोडण्यात आले. त्यामुळे यापुढे मे महिन्यापर्यंत पाच महिन्यांचा कालावधी कोयना धरणासाठी कसरतीचा ठरतो. वीजनिर्मितीची मागणी वाढते, दुसरीकडे पाणी टंचाईमुळे सांगलीकडील गावांना व कोयना नदीकाठच्या शेतीपिकांसाठी सतत पाण्याची मागणी होते. त्यामुळे कोयणा धरणातही खडखडाट होतो, हे राज्याने यापूर्वी अनुभवले आहे. (प्रतिनिधी) कोयना धरणातील पाण्याचा वापर आगामी पावसाळ्यापर्यंत झालेच पाहिजे. धरणात पाणीसाठा राखून ठेवणे म्हणजे योग्य नियोजन केले, असे नाही. धरणातील पाण्याचा वापर पूर्ण क्षमतेने होणे दरवर्षी गरजेचे असते. - एम. आय. धरणे, कार्यकारी अभियंता, कोयना धरण व्यवस्थापन