कोल्हापूर विभागाच्या ‘आॅक्टोबर’च्या निकालात वाढ
By Admin | Updated: November 26, 2014 00:23 IST2014-11-26T00:14:56+5:302014-11-26T00:23:32+5:30
आॅनलाईन निकाल जाहीर : दहावी, बारावीत मुलींची आघाडी

कोल्हापूर विभागाच्या ‘आॅक्टोबर’च्या निकालात वाढ
कोल्हापूर : दहावी, बारावीच्या आॅक्टोबरच्या परीक्षेत यंदा कोल्हापूर विभागाचा निकाल सरासरी सात ते बारा टक्क्यांनी वाढला आहे. दहावीचा ३०.२, तर बारावीचा २५.१२ टक्के निकाल लागला आहे. तीन वर्षांनंतर निकालाच्या टक्केवारीचा आलेख वाढला असून, राज्यात कोल्हापूर दहावीमध्ये चौथ्या, तर बारावीत सहाव्या क्रमांकावर आहे. दोन्ही परीक्षेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज, मंगळवारी दुपारी एक वाजता दहावी व बारावीचा निकाल आॅनलाईन जाहीर केला.
आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर कोल्हापूर विभागीय मंडळाचे सचिव शरद गोसावी, अध्यक्ष भीमराव कांबळे यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली. यावेळी शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी, सहसचिव पी. डी. भंडारे, सहायक सचिव बाळासाहेब शेटे, लेखाधिकारी डी. वाय. कदम, आदी उपस्थित होते. गोसावी म्हणाले, कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांसाठी दहावीसाठी ४९, बारावीसाठी २५ परीक्षा केंद्रांवर २६ सप्टेंबर ते २० आॅक्टोबर या कालावधीत परीक्षा घेण्यात आली. दहावीच्या परीक्षेसाठी ९ हजार ४०४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २ हजार ८२३ विद्यार्थी उत्तीर्ण असून, त्यांची टक्केवारी ३०.२ टक्के आहे. तसेच बारावीची परीक्षा ८ हजार ६४९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यापैकी २ हजार १७३ जण उत्तीर्ण आहेत. त्यांची टक्केवारी २५.१२ टक्के आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत दहावीच्या निकालात १२.४० टक्के, तर बारावीच्या निकालामध्ये ६.५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दहावीतील मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.५४, तर बारावीत १०.७७ टक्क्यांनी अधिक आहे. तीन वर्षांनी विभागाच्या निकालाचा आलेख वाढला आहे. विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांबाबत झालेली जागृती आणि शिक्षकांचे मार्गदर्शन याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. या परीक्षांमध्ये गैरप्रकार करताना सापडलेल्या ११ जणांवर कारवाई केली आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत ४ डिसेंबरला दुपारी तीन वाजता गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकांची छायाप्रत उद्या, बुधवारपासून १५ डिसेंबरपर्यंत घेता येईल. तसेच मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर १२ डिसेंबरपर्यंत गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत आहे. (प्रतिनिधी)
जिल्हानिहाय निकाल (%)
जिल्हादहावी बारावी
कोल्हापूर३६.३९२४.६२
सांगली२८.२२२३.९३
सातारा२४.९८ २६.७२
उत्तीर्ण मुले-मुलींची टक्केवारी
परीक्षामुले मुली
दहावी२९.२४३२.७८
बारावी२३.४२ ३४.१९
राज्यात कोल्हापूर विभाग दहावीमध्ये चौथ्या, तर बारावीच्या आॅक्टोंबरच्या निकालात सहाव्या क्रमांकावर आहे. दोन्ही परीक्षेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे.