शित्तूर - वारुण येथे दिशादर्शक फलक नसल्याने गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:26 IST2021-03-09T04:26:16+5:302021-03-09T04:26:16+5:30
शित्तूर-वारूण या गावातून परिसरात प्रसिद्ध असलेल्या उदगिरी देवस्थान, उखळू व तुरुकवाडी या गावांबरोबरच शिराळा तालुक्यातील आरळा या बाजारपेठेच्या ठिकाणी ...

शित्तूर - वारुण येथे दिशादर्शक फलक नसल्याने गैरसोय
शित्तूर-वारूण या गावातून परिसरात प्रसिद्ध असलेल्या उदगिरी देवस्थान, उखळू व तुरुकवाडी या गावांबरोबरच शिराळा तालुक्यातील आरळा या बाजारपेठेच्या ठिकाणी जाण्यासाठी मुख्य रस्ते आहेत.
उदगिरी या गावामध्ये कालिकामातेचे मंदिर असून अनेक भाविक भक्तांचे ते श्रद्धास्थान आहे. मुंबई, पुणे, कराड, सांगली आदी ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांना उदगिरीला जाण्यासाठी आरळा-शित्तूर हा सोयीचा रस्ता असल्यामुळे या मार्गावरुन जास्तीत-जास्त लोक प्रवास करतात. परंतु शित्तूर-वारूण या ठिकाणी उदगिरी होऊन येताना किंवा उदगिरीकडे जाताना आरळा, उखळू, तुरुकवाडी किंवा उदगिरी असा दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहनचालकांत संभ्रम निर्माण होतो आणि प्रवाशी शिराळे-खेडे किंवा आरळा-चरण या गावाकडे जातात आणि पुढे जाऊन चौकशी केल्यानंतर माघारी फिरून परत उदगिरी किंवा आरळ्याकडे जातात.
सध्या या रस्त्यावर वाहनांची रहदारी फारच वाढलेली आहे. रात्री-अपरात्री रस्ता शोधणे मुश्कील झाले आहे. त्यातच उदगिरीहून येणारा रस्ता उतरंडीच्या वळणाचा असल्यामुळे रस्ता शोधण्याच्या प्रयत्नात अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी संबंधित प्रशासनाने त्वरित दिशादर्शक फलक लावावेत अशी मागणी प्रवासी, वाहनधारकांसह ग्रामस्थांकडून होत आहे.
फोटो:
शित्तूर-वारुण (ता. शाहुवाडी) येथील या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याची वाहनधारकांकडून मागणी होत आहे. (छाया-सतीश नांगरे)