आजऱ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST2021-04-23T04:25:26+5:302021-04-23T04:25:26+5:30
आजरा : आजरा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. २१ दिवसांत २४८ नागरिक बाधित झाले असून ७ जणांचा मृत्यू ...

आजऱ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला
आजरा : आजरा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. २१ दिवसांत २४८ नागरिक बाधित झाले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील ८ ते १० गावे हॉटस्पॉट बनली असल्याने तालुक्यातील सर्वच गावांमध्ये बाहेरच्या नागरिकांना प्रवेश बंदी केली आहे. लग्न, वाढदिवस व अन्य कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून १ एप्रिल २०२१ नंतर २१ दिवसांत तालुक्यात २४८ नागरिक बाधित आढळले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. ९६ नागरिकांवर घरी उपचार, ३१ जणांवर गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालय, ९ जणांवर खासगी हॉस्पिटल तर १ सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. तर आजऱ्यातील कोविड सेंटरमध्ये ७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या उपचारानंतर ३० जणांना घरी पाठविण्यात आले आहे.
गावागावात येणारे चाकरमानी, लग्नसमारंभ, वाढदिवस यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तालुक्यात भादवण, महागोंड, सुळे, कानोली, उत्तूर, चव्हाणवाडी, पेरणोली, लाटगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण आहे. या गावांमध्ये बाहेरच्यांना प्रवेश बंदी केली आहे. पुणे व मुंबईसह अन्य ठिकाणांहून येणाऱ्या चाकरमान्यांना कोरोनाचा अहवाल दाखविल्याशिवाय गावामध्ये प्रवेश दिला जात नाही.
चौकट : शेतीकामावर जाण्यासही वेळेचे निर्बंध
तालुक्यातील अनेक गावांनी वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. भादवण येथे सकाळी ७ नंतर शेतीची कामे करण्यासाठी बाहेर जाण्यास तर सायंकाळी सहानंतर घरी येण्यास परवानगी दिली आहे. भाजीपाला-फेरीवाले यांना सर्वच गावातून बंदी घातली आहे.
आजरा शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची तातडीने कोरोनाची अॅंटिजेन टेस्ट घेतली जाते. त्यामुळे अनेकांनी घरीच थांबणे पसंत केले आहे. मास्क नसेल तर ५०० रुपये दंड व विनाकारण फिरत असेल कोरोनाच्या टेस्टला सामोरे जावे लागत आहे.
शहरामधील सर्व गल्ल्यांमध्ये औषधांची फवारणी सुरू आहे.