सुधारित : निर्बंधाची कडक अंमलबजावणी करा, कुणाची गय नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST2021-06-16T04:33:58+5:302021-06-16T04:33:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्यावर्षी कोल्हापुरात कोरोना काळात जेवढे चांगले काम झाले तेवढे दुसऱ्या लाटेवेळी झालेले नाही. लोकांना ...

Improved: Strictly enforce restrictions, don't let anyone down | सुधारित : निर्बंधाची कडक अंमलबजावणी करा, कुणाची गय नको

सुधारित : निर्बंधाची कडक अंमलबजावणी करा, कुणाची गय नको

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गेल्यावर्षी कोल्हापुरात कोरोना काळात जेवढे चांगले काम झाले तेवढे दुसऱ्या लाटेवेळी झालेले नाही. लोकांना अजिबात गांभीर्य दिसत नाही म्हणून निर्बंधाची कडक अंमलबजावणी करा. कुणाचीही गय करू नका, असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिला.

पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहामध्ये कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नमुना तपासण्यांची संख्या वाढवा, बाधित दर अधिक असणाऱ्या गावांमधील सर्व नागरिकांच्या तपासण्या करुन घ्या, सध्या आठ ते दहा हजार चाचण्या होत आहेत. त्या दीडपट किंवा दुप्पट करा. पहिल्या लाटेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याने चांगले काम केले. आम्हांला फोन यायचे. कोल्हापुरात सोडत नाहीत म्हणून. मग आता असे काय झाले. जे ठरवले आहे त्याची कडक अंमलबजावणी करा. लोकप्रतिनिधींनीही प्रशासनाला मुभा द्यावी. त्यांच्या कामात अडथळा नको. जनरल प्रॅक्टिशनर्स यांच्याशीही बोलून घ्या. ज्यांना त्रास आहे त्यांनी किरकोळ औषधे, गोळ्या न घेता आवश्यक उपचार घेतले पाहिजेत.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, प्रथम दर्शनी कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड, गगनबावडा, शिरोळ तालुक्यामध्ये कोरोनाचा रुग्णदर अधिक आहे. गडहिंग्लज, हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी या तालुक्यात मृत्युदर अधिक आहे. लसीकरणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे, ही चांगली बाब आहे. महाआयुष ॲप, संजीवनी अभियान जिल्ह्यात चांगल्याप्रकारे राबविण्यात येत आहे. कोविड पश्चात सेवा, मृत्युदराचे ऑडिट करून त्रुटी दूर करा. सीपीआर व इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयातील मृत्युदर कमी करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य द्यावे.

जिल्हाधिकारी देसाई यांनी कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असणाऱ्या उपाययोजनाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासनाकडून आवश्यक मागण्या केल्या व आभार मानले.

----------------

पवार यांचा धसका..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून सध्याचे निर्बंध शिथिल करा म्हणून विनंती करण्यासाठी काही व्यापारी संघटनांचे पदाधिकारी गेले होते. परंतु पवार यांचा बैठकीतील नूर पाहून त्यांना मागण्यांचे निवेदन द्यायचे धाडस झाले नाही. त्यामुळे नेलेेले निवेदन खिशात ठेवूनच परत यावे लागले.

साखर कारखाने काय करतात..?

घरी रुग्ण रहात असल्यामुळे अनेकजण बाधित होत आहेत. मग संस्थात्मक अलगीकरण का केले जात नाही अशी विचारणा पवार यांनी केली. जिल्ह्यात एवढे साखर कारखाने आहेत त्यांनी काय केले असा सवालही पवार यांनी विचारला.

चौकट

उपमुख्यमंत्री पवार काय म्हणाले,

१.बाधित रुग्णांकडून संसर्ग फैलावू नये, यासाठी संस्थात्मक अलगीकरण प्रभावीपणे करा.

२. परराज्यातून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची सक्तीने तपासणी करा.

३. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लहान मुलांसाठी वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करा.

४.सीपीआर, इंदिरा गांधी रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सेवा सुविधांसाठी निधी देणार.

५.रुग्णालयांचे फायर, इलेक्ट्रिकल, ऑक्सिजन ऑडिट करून घेऊन त्रुटी दूर करा.

Web Title: Improved: Strictly enforce restrictions, don't let anyone down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.