दुर्लक्षित एकांडा पावनगड

By Admin | Updated: December 16, 2014 23:45 IST2014-12-15T23:22:34+5:302014-12-16T23:45:11+5:30

‘रोप-वे’ला विरोध : पुरातत्त्व खात्यामध्ये समन्वयाचा अभाव

Ignored Ekanda Pavanand | दुर्लक्षित एकांडा पावनगड

दुर्लक्षित एकांडा पावनगड

संदीप आडनाईक -कोल्हापूर -पावनगडचा इतिहास तसा दुर्लक्षितच राहिला आहे. पावनगड म्हटले की, आठवतो तो किल्ले पन्हाळगड. पन्हाळ््याला जितका प्राचीन इतिहास आहे, तितकाच इतिहास पावनगडालाही आहे; पण इतिहासाने त्याची दखल घेतली नाही, कारण तो पन्हाळ््याचाच भाग मानला गेला. या किल्ल्याने शिवकाल पाहिला आहे. थरारक प्रसंगही त्याने अनुभवले आहेत. तसेच अनेकांना जीवदानही दिलेत.
पन्हाळा किल्ल्याचा जोडकिल्ला म्हणून पावनगड इतिहासाची साक्ष देत उभा आहे. आज दुर्लक्षित असलेला हा किल्ला शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनित झालेला आहे. वाघबीळपासून पन्हाळ््यापर्यंत जाताना डाव्या बाजूला असलेला डोंगर म्हणजेच पावनगड. हा डोंगर म्हणजे मार्कंडेय ऋषींचे पावन स्थान. त्यांच्याच नावाने हा डोंगर ओळखला जात होता.
२ मार्च १६६0 मध्ये सिद्दी जौहारने पन्हाळ््याला वेढा दिला. याच वेढ्यादरम्यान या मार्कंडेय डोंगराच्या पूर्व बाजूने पन्हाळ््यावर तोफांचा मारा झाला होता. पन्हाळा किल्ला जिंकून घेतल्यानंतर भविष्यातील हा धोका ओळखून शिवाजी महाराजांनी १६७३ मध्ये या मार्कंडेय डोंगराला बंदिस्त तटाबुरुजांचे बांधकाम करून भक्कम केले आणि त्यालाच पावनगड हे नाव दिले. या किल्ल्याचे बांधकाम करण्याची जबाबदारी घेणाऱ्या अर्जोजी यादव आणि हिरोजी फर्जंद या शिलेदारांना शिवरायांनी प्रत्येकी पाच हजार होन बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला होता.
पावनगडावरील काही बुरूज, तटाचा काही भाग, जुन्या वास्तू, मंदिरे आज जरी पडलेल्या अवस्थेत असले तरी इतिहासाची साक्ष देत तो किल्ला आजही उभा आहे. समुद्रसपाटीपासून ४0४0 फूट उंचीवरील पावनगड सहजासहजी लक्ष वेधून घेणारा नाही. शिवाय शत्रूची दिशाभूल करण्यासाठी शिवरायांनी याची योजना केलेली असल्यामुळे या गडावर सर्वप्रथम हल्ला केला जात असे.
पन्हाळ्यावरील तटबंदी जितकी भक्कम आहे, तितकीच भक्कम तटबंदी आजही पावनगडावर पाहावयास मिळते. पंधरा ते वीस फूट उंचीचे सलग कडे हे पावनगडाचे वैशिष्ट्य. गड बांधताना उभारण्यात आलेली दोन सुंदर दगडी मंदिरेही आजही येथे साक्ष देत उभी आहेत. मात्र, त्यातील मूर्ती मात्र बेपत्ता झाल्या आहेत. कोल्हापूरची गादी महाराणी ताराराणी यांनी पन्हाळ््यावर आणून ती राजधानी केली, त्यानंतरच्या काळात औरंगजेब एक लाख सैनिक घेऊन पन्हाळ््यावर चालून आला. त्यावेळी पावनगडानेच पन्हाळ््याचे रक्षण केले. पन्हाळा-पावनगड ही दुर्गजोडी औरंगजेबालाही नामोहरम करून गेली.
१८४२-४४ मध्ये पन्हाळगडाचे मुख्य प्रवेशद्वार (चार दरवाजा) जेव्हा इंग्रजांनी उद्ध्वस्त केले, त्याचवेळेस पावनगडाचीही नासधूस त्यांनी केली. या किल्ल्याकडे जाणारे दोन दरवाजेही त्यातून सुटले नाहीत.
पावनगड आजही दुर्लक्षित, एकांतवासात आहे. पन्हाळ््याचा हा जोडभाग असला, तरी तो आजही पन्हाळा गिरिस्थान नगरपालिकेचा एक प्रभाग आहे. येथे या ठिकाणी आजही वस्ती आहे.
शासनाने हा किल्लाही संरक्षित करण्याचे ठरविले आहे. या किल्ल्यावर रोप-वे करण्याची तयारीही सुरू आहे. असे असले, तरीही दुर्गप्रेमींपेक्षा या किल्ल्याला प्रेमीयुगुलांचीच जास्त पसंती आहे. मार्कंडेय ऋषींची गुहा, शिवमंदिर, यशवंत बुरूज, चांद-सूरज बुरूज, गणेश मंदिर, ब्लॅक तळे आणि तुपाची विहीर ही पावनगडावर गेल्यानंतर आवर्जुन पाहावीत अशी ठिकाणे आहेत.
या किल्ल्यावर जाण्यासाठी प्रथम पन्हाळ््यावरील काली बुरुजाकडून जावे लागते. काली बुरुजाकडून रेडेघाटीच्या रस्त्याने पावनगडावर
जाता येते. रेडेघाटीचा हा रस्ता म्हणजे दाट झाडीचा रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस मंदिरांचे अवशेष आढळतात.
गडाच्या दक्षिण भागात लगडबंद फकीराचा दर्गाह आहे. या दर्ग्यात जाण्यासाठी पायऱ्या उतरून जावे लागते. याचा उरूस दरवर्षी भरतो. इथेच पूर्वी मार्कंडेय ऋषींची गुहा होती. गडाच्या पूर्व टोकाला असलेले बुरूज अजूनही भक्कम आहेत. या टोकावरून जोतिबाचा डोंगर दिसतो.

शिवकालीन तुपाची विहीर
लढाईत जखमी झालेल्या सैनिकांच्या जखमांवर लावण्यासाठी त्या काळी गायीच्या जुन्या तुपाचा उपयोग केला जात असे. या तूपामुळे जखमा लवकर भरून येत. याशिवाय औषध बनविले जात असे. शिवकाळात विहिरीत जुने तूप साठवून ठेवण्याची व्यवस्था ठराविक किल्ल्यांवरच केली जात असे. शिवरायांनी पावनगडाची त्यासाठी निवड केली. तूप साठविण्याची ही विहीर आजही येथे पहायला मिळते.

पुरातत्त्व खात्याचा समन्वय नाही...
किल्ले पन्हाळगड हा केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात आहे; परंतु याच किल्लाचा भाग असलेला पावनगड मात्र राज्य पुरातत्त्व खात्याकडे आहे, पण या दोन्ही खात्यांत समन्वय नाही.
पन्हाळ््याचे नगराध्यक्ष असिफ मोकाशी यांनी सांगितले, की पावनगड हा पन्हाळ््याच्याच एका प्रभागाचा भाग आहे. तेथे २0 घरे आहेत. तेथे आतापर्यंत ५0 लाखांची कामे झालेली आहेत.
याअंतर्गत अंतर्गत रस्ता, डांबरीकरण, वनखात्याच्या ताब्यात असलेल्या जागेपासून पुढे डांबरीकरण, पाण्याची टाकी, आदी कामे पन्हाळा नगरपालिकेने केली आहेत.
गरुडाचे घरटे पावनगडावर सल्यामुळे वनखात्याकडून जोतिबा ते पावनगड हा रोप-वे करण्यास मंजुरी मिळत नाही. तसेच पर्यावरण प्रेमीनींही रोप-वे ला विरोध केलेला आहे.

Web Title: Ignored Ekanda Pavanand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.