शहर सुधारणाकर्त्याची कोल्हापुरातच उपेक्षा
By Admin | Updated: September 5, 2016 00:34 IST2016-09-05T00:34:28+5:302016-09-05T00:34:28+5:30
पालिकेला जे. पी. नाईक यांचा विसर : आज जयंती; स्मृती जपण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज

शहर सुधारणाकर्त्याची कोल्हापुरातच उपेक्षा
समीर देशपांडे ल्ल कोल्हापूर
ज्यांनी १९४३ ते १९४६ या कालावधीत कोल्हापूर शहरामध्ये सुधारणांचा झंझावात निर्माण केला, ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण सन्मानित डॉ. जे. पी. नाईक यांचा मात्र कोल्हापूर महानगरपालिकेला विसर पडला आहे. शहरामधील तळी बुजवून विविध संस्थांना जागा देणारे, ताराबाई आणि सुभाष रोडची निर्मिती करणारे, गांधी मैदान, पद्माराजे गार्डन तयार करवून घेणारे; एवढेच नव्हे तर फुलेवाडीसारखे प्रशस्त खेडे वसविणारे नाईक मात्र करवीरनगरीत उपेक्षित राहिले आहेत.
आयुष्यभर ज्यांनी शिक्षणक्षेत्रासाठी ध्यास घेऊन काम केले, ज्यांची या क्षेत्रातील श्रेष्ठता ‘युनेस्को’नेही मान्य केली, त्या डॉ. जे. पी. नाईक यांची आज, ५ सप्टेंबर ही जयंती. मात्र या दिवशी अपवादात्मक ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन होते किंवा त्यांना अभिवादन केले जाते. महापालिकेने त्यांनी कोल्हापूर शहरासाठी केलेल्या कामाची दखल घेत, त्यांच्या स्मृती जतन करण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
५ सप्टेंबर १९०७ रोजी आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथे नाईक यांचा जन्म झाला. गणित विषयातील पदवीनंतर त्यांनी १९३० ते १९३७ या काळात स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला व धारवाड येथे शिक्षण मंडळाची स्थापना करून त्या परिसरात ग्रामीण विकासाचे कार्य केले. यानंतर १९४० ते १९४६ या कालावधीत कोल्हापुरात शहर विकासाचे मोठे काम त्यांनी केले. १९४८ ला ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ एज्युकेशन’ या संस्थेची मुंबईत स्थापना केली. १९५२ ते १९५७ या कालावधीत त्यांनी गारगोटी येथे मौनी विद्यापीठाची स्थापना करून उभारणी केली. १९५९ ते १९७८ या काळात त्यांनी दिल्ली येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सल्लागार यासह केंद्रीय पातळीवरील विविध पदांवर काम केले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना १९७४ साली ‘पद्मभूषण’ने सन्मानित केले. यानंतरही त्यांनी १९७८ ते ८१ या कालावधीत पुण्यात भारतीय शिक्षण संस्थेची स्थापना केली व तेथे अध्यापनही केले.
एवढं मोठ्ठं काम केलेल्या या असामीने कोल्हापुरात तत्कालीन मंत्री पेरी, मिचेल, डॉ. पाटील, बॅ. बागवे, भास्करराव जाधव या मान्यवरांच्या सहकार्याने कोल्हापुरात शहर सुधारणांचा डोंगर उभा केला. त्याही वेळी त्यांनी अनेक कामे काढली म्हणून काहींनी टीका केली. मात्र शहर सुधारणेचे काम हे एकावर एक अवलंबून आणि परस्परपूरक असल्याचे त्यांनी पटवून दिल्यानंतर साहजिकच त्यांना पाठिंबा मिळत गेला.
रस्ते तयार करताना अनेक घरे पाडावी लागत तेव्हा नोटिसा न पाठवता नाईक संबंधितांच्या घरी जात. त्याला अधिकाधिक नुकसानभरपाई कशी दिली जाईल, ते समजावून सांगत आणि त्यानंतर त्याची संमती घेत. अशा पद्धतीने त्यांनी अंबाबाई मंदिरासमोरून १४ घरे पूर्ण, अंशत: पाडून, ५० लहान-मोठ्या जागा ताब्यात घेऊन रंकाळ्यापर्यंत ताराबाई रस्त्याची निर्मिती केली.
नाईक यांच्या काळातील शहर सुधारणा
४दत्ताजीराव माने स्कूल, ताराबाई विद्यालय व रविवार पेठेत शेलाजी वनाजी शाळेची स्थापना
४तळी व दलदल मुजवून प्रायव्हेट, न्यू एज्युकेशन, विद्यापीठ हायस्कूलला मैदानासाठी दिली जागा
४वरुणतीर्थ तळे मुजवून तेथे मैदान करून महात्मा गांधींचा पुतळा बसविला
४रावणेश्वर तळे मुजवून ती जागा कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनला दिली
४सन १९४४ ला भास्करराव जाधव वाचनालयाची स्थापना
४शालिनी पॅलेसमागे आदर्श खेडे तयार करण्यासाठी पाडले प्लॉट, तीच आजची फुलेवाडी
४रंकाळ्यासमोरील दीड एकरांतील डबके मुजवून तेथे पद्माराजे गार्डन
४हागणदारी मुक्तीसाठी भंगी पॅसेज योजनेचा शुभारंभ
सतेज पाटील यांनी मनावर घेण्याची गरज
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महापालिकेत सत्ता असताना ज्या मौनी विद्यापीठाचे नेतृत्व सतेज पाटील करतात, त्याची स्थापनाही नाईक यांनीच केली. त्यामुळे पाटील यांनी ठरवल्यास नाईक यांच्या स्मृती जतन करता येतील.
मुश्रीफ यांनी घेतली दखल
आजरा तालुक्यातील सु. रा. देशपांडे यांनी पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा परिषदेने ३० वर्षांपूर्वी नाईक यांच्या प्रतिमा सर्व शाळांमध्ये लावल्या. त्यानंतर तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील नाईक यांचे बहिरेवाडी हे जन्मगाव. येथे मागणीची दखल घेत मुश्रीफ यांनी सुमारे अडीच कोटी रुपयांचे नाईक यांचे स्मारक मंजूर करून आणले. त्याचे काम वेगाने सुरू आहे.