आत्मीयतेने काम केल्यास अव्वलस्थान कायम राहील
By Admin | Updated: August 11, 2014 00:17 IST2014-08-10T23:43:18+5:302014-08-11T00:17:41+5:30
पतंगराव कदम : मुख्य वनसंरक्षक कार्यालयाचे उद्घाटन

आत्मीयतेने काम केल्यास अव्वलस्थान कायम राहील
कोल्हापूर : राज्याचा वन विभाग देशात अव्वलस्थानी आहे, असा गौरव दिल्लीस्थित केंद्रीय वनविभागाने केला आहे. अशा पद्धतीचे काम आपल्या विभागाने केले आहे. हेच काम आणखी नियोजनपूर्वक केल्यास अव्वलस्थान कायम राहील, असे प्रतिपादन राज्याचे वने व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी केले. ताराबाई पार्क येथील मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कदम म्हणाले, पुणे येथे वन विभागाची अकरा कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी होती. ही कार्यालये आज, रविवारी एकाच छताखाली आणण्याचे काम केले. उद्योग, सहकार आणि शिक्षण या क्षेत्रात काम केल्याने आपल्याला वन विभागाचे काम करताना कोणतीही अडचण आली नाही. त्यामुळे प्रथमच आपण १०० कोटी झाडे लावण्याचा निर्णय घेतला आणि त्यातील ४१ कोटी झाडे लावली.
याचबरोबर ७५०० हजार वन कर्मचाऱ्यांना कायम केले. याचबरोबर ताडोबासारख्या जंगलात वाघांची संख्याही २०० च्यावर वाढविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. सिधुदुर्ग जिल्ह्यात कायम कर्नाटकातून हत्ती येत आहेत. यावर नुकसान झालेल्यांच्या निधीतही वाढ केली आहे. वनमंत्री असून आपण साधे दाजीपूर अभयारण्यही पाहिलेले नाही अशी कबुली त्यांनी यावेळी दिली.
यापूर्वी दोन लाख दिले जात होते. तर आता पाच लाख रुपये दिले जातात. याचबरोबर वनक्षेत्र २१ टक्कयावरून ३० टक्के करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी १०० कोटींची तरतूद केली आहे. उच्च शिक्षित कर्मचारी वर्ग वन विभागाच्या सेवेत आल्याने वन विभागाचा कायापालट झाला आहे. सर्व राज्यात महाराष्ट्र राज्य वन क्षेत्रात आघाडीवर आहे. हे अव्वलस्थान कायम टिकवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी संपुर्ण योगदान दिल्यास हे अव्वलस्थान कायम राहील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी केले. मुख्य वनसंरक्षक जी. साईप्रकाश यांनी स्वागत केले.