रुची घेऊन संशोधन केल्यास मिळते भरीव यश
By Admin | Updated: January 2, 2015 00:58 IST2015-01-02T00:50:59+5:302015-01-02T00:58:25+5:30
सुभाष खोत : शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

रुची घेऊन संशोधन केल्यास मिळते भरीव यश
कोल्हापूर : विषय अध्ययनात आणि संशोधनात रुची असेल तरच संशोधन क्षेत्रात भरीव यश संपादन करता येते. मला गणिताची सुरुवातीपासून आवड होती आणि म्हणूनच मी त्या संदर्भातील संशोधनाकडे वळलो, असे भारताचे युवा गणिततज्ज्ञ डॉ. सुभाष खोत यांनी आज, गुरुवारी येथे सांगितले.
गणितातील नोबेल पुरस्कार समजला जाणारा आंतरराष्ट्रीय रॉल्फ नॅवेलिना पुरस्कार पटकाविणाऱ्या डॉ. खोत यांच्यासोबत चर्चेने आज शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी नववर्षाचा प्रारंभ झाला. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात त्यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, तर बी.सी.यू.डी. संचालक डॉ. अर्जुन राजगे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, डॉ. खोत यांच्या मातोश्री डॉ. जयश्री खोत प्रमुख उपस्थित होत्या.
डॉ. खोत यांनी स्वत:च्या संशोधनाविषयी सोप्या शब्दांत तपशीलवार माहिती दिली. कोणतीही गणितीय व संगणकीय समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असणारे पद्धतशीर अल्गॉरिदम तयार करणे; ती समस्या सोडविण्यासाठी लघुतम मार्ग शोधणे हा आपल्या संशोधनाचा मूलभूत पाया आहे. संशोधन अधिक प्रभावी होण्यासाठी संशोधकांवरील अध्यापन व प्रशासकीय जबाबदाऱ्यांचे प्रमाण कमी करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे संशोधनासाठी आवश्यक स्वातंत्र्य, स्वायत्तता देण्याबरोबरच आवश्यक निधीची तरतूद तसेच पुरस्कारांची योजना करण्याची आवश्यकता आहे. संशोधक आणि शिक्षक यांच्यामध्ये स्पर्धेऐवजी सामंजस्य व परस्पर विश्वासाची भावना वृद्धिंगत होण्याला खूप महत्त्व असल्याचेही त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, विद्यार्थ्यांनी डॉ. खोत यांच्यापासून प्रेरणा घेऊन संशोधनाच्या विविध क्षेत्रांत करिअर करण्यासाठी पुढ
े यावे.
यावेळी विद्यापीठातर्फे डॉ. खोत आणि त्यांच्या मातोश्रींचा स्मृतिचिन्ह व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. आर. के. कामत यांनी स्वागत केले. कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी)
शंकांचे समाधान...
सध्या न्यूयॉर्क विद्यापीठाच्या कोरंट इन्स्टिट्यूट आॅफ मॅथेमॅटिकल सायन्सेसमध्ये संगणकशास्त्राचे प्राध्यापक असलेले डॉ. खोत हे मूळचे इचलकरंजीचे आहेत. नव्या वर्षाची प्रेरणादायी सुरुवात करण्याचे ठरवून शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद घडवून आणण्याचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी ठरविले होते. त्यानुसार आज सकाळच्या सत्रात डॉ. खोत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. आपल्या एकूण कारकिर्दीविषयी आणि संशोधनाविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मनमोकळेपणे माहिती दिली आणि त्यांच्या शंकांचे समाधानही केले.