‘तात्काळ’ला ओळखपत्र सक्ती रद्द
By Admin | Updated: August 20, 2015 22:57 IST2015-08-20T22:57:36+5:302015-08-20T22:57:36+5:30
रेल्वेचा निर्णय : तिकीट एजंटांची पुन्हा चलती

‘तात्काळ’ला ओळखपत्र सक्ती रद्द
मिरज : रेल्वेच्या तात्काळ तिकिटांसाठी आता ओळखपत्राची सक्ती रद्द करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान ओळखपत्र दाखवून सामान्य आरक्षित तिकिटांप्रमाणे तात्काळ तिकिटावर प्रवास करता येणार आहे. आजपासून ओळखपत्राशिवाय तात्काळ तिकिटांचे बुकिंग सुरु झाले आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे पुन्हा तिकीट एजंटांची चलती होणार आहे.
रवासाच्या तारखेअगोदर एक दिवस अगोदर मिळणाऱ्या तात्काळ तिकिटांसाठी ओळखपत्राची अट होती. ओळखपत्राची झेरॉक्स देऊन मिळणाऱ्या तात्काळ तिकिटावर ओळखपत्राचा क्रमांक नोंद करण्यात येत होता. नोंद असलेल्या क्रमांकाचे ओळखपत्र प्रवासादरम्यान दाखविण्याची सक्ती असल्याने, त्या क्रमांकाचे ओळखपत्र नसेल, तर प्रवाशाला विनातिकीट ठरवून दंडाच्या आकारणीची तरतूद होती. तात्काळ तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तिकीट काढण्यासाठी प्रवाशाच्या ओळखपत्राची सक्ती लागू केली. त्यानंतरही तिकिटांचा काळाबाजार सुरुच राहिल्याने, तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीचेही ओळखपत्र घेण्यात येत होते. मात्र तरीही आरक्षित रेल्वे तिकिटांचा काळाबाजार सुरूच असल्याचे चित्र आहे. तिकिटांच्या काळ्याबाजाराला प्रतिबंध घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने गेल्या दोन वर्षात वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. मात्र या उपाययोजना परत गुंडाळण्यात येत आहेत. तात्काळ तिकिटांसाठी ओळखपत्राच्या झेरॉक्सची सक्ती असल्याने तिकीट एजंटावर निर्बंध आले होते. या निर्णयाने पुन्हा अवैध तिकीट विक्री करणाऱ्या एजंटांचे फावणार आहे. (वार्ताहर)