इचलकरंजीत संघर्षाची चिन्हे
By Admin | Updated: May 28, 2015 00:58 IST2015-05-28T00:01:09+5:302015-05-28T00:58:18+5:30
स्वच्छतेचा प्रश्न : कामगार संघटनांचा ‘खो’; बचतीचे धोरण बारगळण्याची शक्यता

इचलकरंजीत संघर्षाची चिन्हे
इचलकरंजी : बचतीच्या धोरणाचा स्वीकार करून येत्या १ जूनपासून शहरातील दहा वॉर्डात साफसफाई व कचरा उठावाचे काम नगरपालिका कर्मचाऱ्यांमार्फतच करण्याचा निर्णय नुकताच घेतला. त्याला कामगार संघटनांनीसुद्धा संमती दर्शविली, पण आता जादा कामाचे कारण सांगत काही कामगार संघटना या उपक्रमाला ‘खो’ घालण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे स्वच्छता प्रश्नावरून पदाधिकारी व कामगार संघटनांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, शनिवारी ३० मे रोजी होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर हा विषय ठेवला असून, या विषयावर सभेमध्ये जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. शहरातील एकूण २५ प्रशासकीय वॉर्डांपैकी सध्या १४ वॉर्डांमध्ये खासगी मक्तेदारामार्फत साफसफाई व कचरा उठावाचे काम केले जाते. यासाठी वर्षाला सुमारे ७ कोटी रुपयांचा बोजा पालिकेवर पडत आहे. यातून बचतीचा मार्ग काढण्याच्या उद्देशाने नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी पालिकेचे पाच कोटी रुपये कसे वाचतील, या संदर्भात विस्तृत आराखडा तयार केला होता. त्यावर चर्चा होऊन संमतीही मिळाली.
पालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता चार दिवसांपूर्वी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी प्रमुख मंडळी व नगरसेवकांची बैठक घेऊन साफसफाई व कचरा उठावाचे काम पालिका कर्मचाऱ्यांमार्फतच करण्याचा निर्णय घेतला. विविध कामगार संघटनांच्या पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी संमती दर्शविली. त्यानुसार १ जूनपासून हा उपक्रम हाती घेण्यात येणार होता.
संमतीनंतरही काही संघटनांचा विरोध
काही संघटनांनी या उपक्रमाला विरोध दर्शविण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी जादा कामाचे कारण पुढे केले जात आहे. मुळातच शासकीय नियमानुसार कामापेक्षाही कमी प्रमाणात काम स्वच्छता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या उपक्रमातून पालिकेची पाच कोटी रुपयांची बचत होणार आहे, पण संमतीनंतर आता काही संघटना त्याला विरोध करू लागल्याने या मागचे नेमके कारण काय, असा सवाल केला जात आहे.