इचलकरंजीत पोलिसांना मिळणार गुढीपाडव्याची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:24 IST2021-04-13T04:24:18+5:302021-04-13T04:24:18+5:30
अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील दिवसेंदिवस वाढत जाणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी आता पोलिसांची २४ तास गस्त वाढणार ...

इचलकरंजीत पोलिसांना मिळणार गुढीपाडव्याची भेट
अतुल आंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील दिवसेंदिवस वाढत जाणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी आता पोलिसांची २४ तास गस्त वाढणार आहे. त्यासाठी इचलकरंजी पोलीस दलाला ई-बीट मार्शल सिस्टम अंतर्गत ९ अत्याधुनिक मोटारसायकली मिळणार आहेत. त्यांच्या माध्यमातून शहरातील १२८ ठिकाणी लावलेले क्यूआर कोड स्कॅन करत गस्त घातली जाणार आहे. त्यामुळे घटनास्थळावर अवघ्या काही मिनिटातच पोलीस पोहोचणार आहेत. वस्त्रनगरीत देशभरातील अनेक राज्यांमधून नागरिक कामानिमित्त येवून राहिले आहेत. औद्योगिकीकरणामुळे उद्योगधंदे, कामगार संख्या वाढली, त्यापाठोपाठ गुन्हेगारीही फोफावली. त्यावर जरब बसविण्यासाठी आता पुण्यात राबविण्यात आलेली ई-बीट मार्शल सिस्टम कोल्हापूर व इचलकरंजी शहरात राबवली जाणार आहे. इचलकरंजीसाठी ९ अत्याधुनिक मोटारसायकली गुढीपाडव्यादिवशी मिळणार आहेत. या गाड्यांना सायरन वाजवणे, सूचना देणे (पुकारणे), फ्लॅश लाईट अशा आधुनिक सुविधा आहेत. त्यासाठी १८ दिवस व १८ रात्र असे ३६ पोलीस नियुक्त केले जातील. त्यांच्या माध्यमातून २४ तास संपूर्ण शहरात गस्त सुरू राहील.
गस्त सुरू असल्याची माहिती प्रत्येकवेळी पोलीस उपअधीक्षकांना मिळण्यासाठी शहरातील १२८ ठिकाणे निवडण्यात आली असून, त्या ठिकाणांवर क्यूआर कोड बसविण्यात आला आहे. प्रत्येक बीट मार्शलने नेमून दिलेल्या ठिकाणांवर जावून तो कोड स्कॅन करावयाचा आहे. तेथून कोणती मोटारसायकल कोठे आहे, यासंदर्भातील माहिती उप-अधीक्षकांना मिळत राहणार आहे. यामुळे एखादी घटना घडल्यास संबंधित बिट मार्शलला माहिती दिल्यानंतर काही मिनिटातच ते घटनास्थळी पोहोचतील. या आधुनिक व्यवस्थेमुळे शहरातील गुन्हेगारीवर वचक बसवणे. त्याचबरोबर चेन स्नॅचिंग, वाटमारी, मारामारी अशा घटनांमध्ये तत्काळ हालचाली (ॲक्शन) मुळे फरक पडणार आहे.
चौकटी
क्युआर कोडची विभागणी
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६०, गावभाग पोलीस ठाणे ३६, तर शहापूर पोलीस ठाणे ३२ अशा १२८ ठिकाणी क्युआर कोड बसविण्यात येणार आहे.
चारचाकी वाहनांची मागणी
इचलकरंजी शहरासाठी किमान ९ चार चाकी वाहने आवश्यक आहेत. सध्या तीनच उपलब्ध असून, त्याही वारंवार बिघडतात. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी करण्यात आली आहे.