हसूरकरांनी दिला ‘जल है, तो कल है’ चा नारा
By Admin | Updated: March 17, 2016 01:01 IST2016-03-17T00:56:06+5:302016-03-17T01:01:35+5:30
जलव्यवस्थापनाचा आदर्श : ‘नळ तिथे मीटर’ योजना यशस्वी; सार्वजनिक चावी नाही

हसूरकरांनी दिला ‘जल है, तो कल है’ चा नारा
कोल्हापूर : हसूर (ता. शिरोळ) येथील शंभर टक्के नळांना मीटर बसवण्यात आले आहेत. या गावांत एकही सार्वजनिक चावी नाही. नळ पाणीपुरवठा योजना राबवून जलव्यवस्थापनाचाही आदर्श हे गाव सांगत आहे. काल, बुधवारपासून ‘जलजागृती सप्ताह’ सुरु झाला. त्या पार्श्वभूमीवर या गावाने कृतीतून ‘जल है, तो कल है...’हा नारा जोपासला आहे याची माहिती घेणे इतर गावांना मार्गदर्शक ठरेल.
शासनाच्या योजनेचा पुरेपूर फायदा घेऊन अडीच हजार लोकसंख्येचे गाव गेली आठ वर्षे जलस्वराज्य प्रकल्प राबवत आहे. गावाला पिण्याचे शुद्ध व मुबलक पाणी मिळत आहे. ग्रामीण भागातील शंभर टक्के नळांना मीटर असणारे शिरोळ तालुक्यातील हे पहिलेच गाव आहे. गावात पाऊल टाकताच गावातील स्वच्छता नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. गावातल्या उभ्या आडव्या गल्ल्यांमधून फिरताना कागदाचा एक कपटाही पडलेला दिसत नाही. सांडपाण्यासाठी भुयारी गटारे हे या गावचे आणखी एक वेगळेपण. गावात सन २००५ मध्ये यशवंत ग्रामसमृद्धी योजनेमधून जलस्वराज्य प्रकल्प मंजूर करण्यात आला. सन २००८-०९ पासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाला. दहा टक्के लोकवगर्णीतून साठ लाख रुपयांचा निधी जलस्वराज्य प्रकल्पांतर्गंत खर्च करण्यात आला. या निधीतून नऊ गुंठे जमिनीत पाण्याची टाकी, शुद्धिकरण यंत्रणा बसविण्यात आली.
(हॅलो ६ वर)
दृष्टिक्षेपात जलव्यवस्थापन..
२००८-०९ पासून गावातील ४८० नळांना मीटर.
गावात एकही सार्वजनिक नळ जोडणी नाही.
जलजन्य आजार वा साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव नाही.
वीज बिल थकबाकी शून्य.
पाणी शुद्धिकरणासाठी इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर.
१९६५ साली लोगवर्गणीतून भुयारी गटारांची बांधणी
एक हजार लिटरला सहा रुपये प्रमाणे शंभर टक्के पाणी करवसुली.